वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी वर्धा, 26 फेब्रुवारी: शेतमालाला हमी भाव दिला जाईल, अशा घोषणा सातत्याने होतात. बाजारात नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. मात्र सध्या बाजारात हमी भावापेक्षा हरभऱ्याला कमी भाव मिळत आहे, अशा स्थितीत शासकीय खरेदी सुरू होणे गरजेचे आहे. शासनाचे कोणतेही आदेश नसल्यामुळे वर्ध्यातील शेतकऱ्यांना आपले पीक कमी भावात विकावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या आशा रब्बी पिकावर गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या संततधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तर आता खरीप हंगामातील मालाला गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी भाव मिळत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या आशा रब्बी पिकावर होत्या. पावसामुळे खरीप पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीसाठी जमीन तयार करून हरभऱ्याची पेरणी केली.
बाजारात हरभऱ्याची आवक वाढली हरभऱ्याचे चांगले पीक आल्याने शेतकऱ्यांना अधिक भाव मिळण्याची अपेक्षा होती. मात्र हरभरा बाजारात येताच परिस्थिती बदलली आहे. बाजारभाव आणखी खाली आले आहेत. गेल्या पंधरवड्यापासून बाजारात दररोज हरभऱ्याची आवक वाढली आहे. त्यामुळे हमीभावापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. हमी भाव 5325 रुपये तर बाजारभाव 4400 रुपये शासनाने यंदा हरभऱ्याचा हमी भाव 5325 रुपये प्रतिक्विंटल जाहीर केला आहे. मात्र बाजारात शेतकऱ्यांचा माल 4200 ते 4400 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे. शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा सुमारे 800 ते 900 रुपये कमी भाव मिळत आहे. नियमानुसार बाजारात हमीभावापेक्षा कमी भाव मिळाल्यास शासकीय खरेदी सुरू करणे बंधनकारक आहे. Nashik News : खर्चही निघेना, कांदा उत्पादकांच्या डोळ्यात ‘अश्रू’, शेतकऱ्यांचा भावूक सवाल Video शेतकऱ्याचे मोठे नुकसान शासनाने आजपर्यंत हरभरा खरेदीबाबत कोणतीही उपाययोजना न केल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरिपाचे पीकही हाताबाहेर गेले, अशा स्थितीत हरभऱ्याचे चांगले उत्पादन होऊनही कमी भावामुळे त्याचे आर्थिक कंबरडे पूर्णपणे मोडत आहे.