वर्धा, 21 ऑगस्ट : राज्यात रोज एक शेतकरी कोणत्या कोणत्या कारणाने आत्महत्या करत असतो. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना अस्मानी संकटासोबत सावकारीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. (Wardha Farmer Suicide) यंदा विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात महापूर अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पार दैना उडवून टाकली आहे. काल एका शेतकऱ्याने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रीया येत आहेत.
यंदा अतिवृष्टीमुळे वर्धा जिल्ह्यात हजारो एकर शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यानंतर केंद्रीय पथक, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीची पाहणी केली. सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा केली परंतु कोणतीही ठोस अंमलबजावणी केली नसल्याचे दिसून आले. यातूनच शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहे.
हे ही वाचा : Raigad Boat : हरिहरेश्वर इथं सापडलेल्या बोटीतील फ्रीजमध्ये...., निलेश राणेंचा खळबळजनक दावा
शेतकरी शासकीय मदतीकडे डोळे लावून बसले असतानाच भदाडी नदीच्या पुरात पीक खरडून गेलेल्या एका शेतकऱ्याने थेट जिवंत विद्युत तार तोंडात घेऊन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. गणेश श्रावण माडेकर (वय ३६, रा. पढेगाव) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यांतर्गत पढेगाव येथील गणेश माडेकर यांच्याकडे साडेसहा एकर शेती आहे. त्यांनी तूर, सोयाबीन व कपाशीची लागवड केली. अंकुरलेल्या पिकाची बऱ्यापैकी वाढ होत असतानाच अतिवृष्टीमुळे भदाडी नदीला पूर आला. त्यात माडेकर यांच्या शेतातील संपूर्ण पीक खरडून गेले.
नेत्यांसह केंद्रीय पथकाने नुकसानीची पाहणी केल्याने लवकरच शासकीय मदत मिळेल, अशी आशा त्याला होती; पण हवालदिल झालेल्या गणेश यांचे मनोधैर्य खचले. त्यातच त्यांनी प्रवाहित वीज तार तोंडात धरून जीवनयात्रा संपविली. सावंगी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. पढेगावावर पसरली शोककळा गणेश माडेकर याच्या पश्चात पत्नी, आठ वर्षीय मुलगा, सहा वर्षीय मुलगी तसेच वयोवृद्ध आई वडील असा मोठा परिवार आहे.
हे ही वाचा : MLA Bachchu Kadu : बच्चू कडूंची नाराजी उघड; कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि नवनीत राणांपुढे सरकारला विचारला जाब
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमिवर बाधित भागाची पाहणी केली. बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. चांदुर बाजार तालुक्यातील रोहणखेड येथे त्यांनी भेट दिली. तेथील रामरावजी पचारे यांच्या शेताची पाहणी केली. शेतजमीन खरडून निघाली असून सोयाबीन व कापसाच्या पीकाच्या झालेल्या नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Farmer protest, Wardha, Wardha news