मुंबई, 25 फेब्रुवारी : राज्यात सत्तासंघर्षाच्या सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. जर 16 आमदार अपात्र ठरले तर राज्यात पुन्हा सत्ताबदल किंवा मध्यावधी निवडणूका लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. सुप्रिम कोर्टाने 16 आमदारांना अपात्र ठरवले तर राज्याच्या राजकारणाला नवे वळण येण्याची शक्यता आहे. या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता नवी राजकीय समिकरणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनीही पलटवार केला आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे विरोधकांवर जोरदार प्रहार करताना दिसत आहेत. यावेळी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर उद्धव ठाकरे यांनी एक खळबळजणक वक्तव्य केल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरेंनी राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता बोलून दाखवली आहे. पुण्यातील कसब्यात काँग्रेस आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी यांना आपल्याला विजयी करावंच लागेल.
हे ही वाचा : औरंगाबादच्या नामांतराचा वाद पेटणार? एमआयएमचं सरकारला थेट आव्हान
पण माझा अंदाज आहे की विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागेल किंवा लागू शकेल. कारण अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ते आमदार जर अपात्र ठरले तर आपल्या राज्यात मध्यावधी लागू शकतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरून शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी पलटवार केला आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची काहीही शक्यता नाही. आमच्याकडे 170 आमदारांचं बहुमत आहे. शिवाय 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं विधान उदय सामंत यांनी केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? या चर्चांना उधाण आले आहे.
हे ही वाचा : करुन दाखवलं! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामकरणाला केंद्र सरकारची मंजुरी : फडणवीस
लोकशाहीमध्ये आणि मंत्रीमंडळ स्थापन करताना बहुमत महत्त्वाचं असतं. १७० आमदार आमच्याबरोबर आहेत, हे वारंवार आम्ही सांगितलं आहे. अजून 15 ते 20 लोक आमच्या संपर्कात आहेत. येत्या एक-दोन दिवसात आपल्याला याची प्रचिती येईल. त्यामुळे मध्यावधी निवडणुका लागण्याची काहीही शक्यता नाही. आपले कार्यकर्ते सैरभैर होऊ नये. निवडणूक आयोगाच्या निकालामुळे आपल्या कार्यकर्त्यांना नैराश्य येऊ नये, म्हणून उद्धव ठाकरेंनी ते विधान केलं आहे.