बुलढाणा, 26 नोव्हेंबर : काहीजण 40 रेडे घेऊन तिकडे गेलेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर टीका केली. जिल्ह्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे मुंबईनंतर माझी ही पहिलीच जाहीर सभा आहे. ज्या ठिकाणी जिजाऊंचा जन्म झाला. आज संविधान दिन आहे. मात्र, संविधान म्हंटल्यावर काय बोलायचे हा प्रश्न आहे. कारण, संविधान आज सुरक्षित आहे का? हा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी मी आणि प्रकाश आंबेडकर एका मंचावर आलो होतो. त्यावेळी मनात प्रश्न आला लोकशाही कशी वाचवायची? काही जण 40 रेडे घेऊन तिकडे गेलेत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका.
मी मुख्यमंत्री झालो तेव्हा शिवतीर्थावर शपथ घेतली आणि एकविरा देवीकडे गेलो होतो. स्वतःचे आयुष्य माहीत नाही ते भवितव्य काय ठरवणार? आज नवस फेडायला आणि गेल्या आठवड्यात हात दाखवायला गेले होते. या मेळाव्याला हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा हा शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तुमच्याकडे बघून धगधगत्या मशाली वाटत आहेत. सरकार कशा पद्धतीने पाडले गेले, ते तुम्ही पाहिले. नितीन देशमुख यांना नेले होते, ते परत आले. काय झाडी काय डोंगर एकदम ओके होते. मी जिजाऊच्या भूमीवर शेतकरी आशीर्वाद घ्यायला आलोय. भाजप हा पक्ष आहे की चोर? सगळे लोक आयात करुन पक्ष चालवत आहे. 40 गद्दारांना प्रश्न विचारतो उत्तर द्या. त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची हिम्मत दाखवावी. छत्रपतींचा अपमान करायचा, गुजरातमध्ये निवडणुका आहेत म्हणून उद्योग तिकडे नेले. राज्यातील तरुणांना बेरोजगार ठेवायचं. सोलापूर कर्नाटकमध्ये गेल्यावर माझा विठ्ठल नेणार का? अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया ताईंचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो तर लाथ घालून बाहेर काढला असता. नवस काय फेडता स्वतःवर विश्वास नाही का? आम्ही विमा कंपनीची मस्ती मोर्चा काढून उतरवली होती. आता पुन्हा त्याची गरज आहे.