पालघर, 9 सप्टेंबर: पालघर (Palghar) जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील कुर्झे धरणाजवळ वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. तलासरी पोलीस आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. गेल्या तीन दिवसांतील ही तिसरी घटना आहे.
हेही वाचा..धमक्यांचे फोन मलाही येत होते, मी त्याला गांभीर्याने घेत नाही – शरद पवार
मिळालेली माहिती अशी की, तलासरी तालुक्यातील कुर्झे धरणाजवळ बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना ही घटना घडली. सचिन जयराम कुवरा (वय-27), अतुल बाबु गोवारी (वय-18, दोघेही रा. बेंडगाव ता.डहाणू) अशी मृतांची नावं आहेत.
दरम्यान, गेल्या तीन दिवसातील ही तिसरी घटना आहे. या आधी 6 सप्टेंबरला डहाणू आणि वाडा तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला होता. डहाणू तालुक्यातील तवा येथे वीज कोसळून नितेश हाळ्या तुंबडा या 20 वर्षीय तरुणाचा तर वाडा तालुक्यात शांताराम दिवा या तरुणाचा मृत्यू झाला होता. तर त्याच्या सोबतचे 5 तरुण जखमी झाले आहेत.
रविवारी (6 सप्टेंबर) सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. पावसापासून संरक्षणासाठी हे सर्व तरुण एका झाडाखाली जमा झाले होते. यावेळी सागर शांताराम दिवा या तरुणाच्या अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याच्या सोबतचे संदिप अंकुश दिवा (वय 25), अनंता चंद्रकांत वाघ (वय 24), रविंद्र माधव पवार (वय18), नितेश मनोहर दिवा (वय 19) व सनी बाळु पवार (वय 18) हे जखमी झाले आहेत. जखमींना खानिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.
दुसरीकडे, डहाणू तालुक्यातील तवा येथे वीज पडून जितेश हाल्या तुंबडा (वय 22) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तसंच अनिल सुधाकर धिंडा वय 20 जखमी झाला आहे. त्याला वेदांत हॉस्पिटलमध्ये आहे नेण्यात आले आहे. साईबाबा मंदिर येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या या दोघांवर वीज कोसळली होती.
हेही वाचा...पुन्हा एल्गार! मराठा संघटना आक्रमक, तीन पायाची खुर्ची जाळून केला सरकारचा निषेध
दरम्यान, पावसाळ्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये वीज कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे वीजांसह पाऊस सुरू असताना सुरक्षेत ठिकाणी आसरा घ्यावा, असं आवाहन करण्यात येत आहे.