नागपूर, 10 ऑगस्ट : लॉकडाउनच्या काळात आलेल्या वीज बिलांमुळे सर्वसामान्यांना चांगलाच दरवाढीचा फटका बसला आहे. वीज बिल कमी करावे अशी मागणी एकीकडे होत असताना नागपूरमध्ये एका 56 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नागपूरमधील यशोधानगर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. लीलाधर गायधणे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. लीलाधर गायधणे यांना एकत्रित तब्बल 40 हजार रुपयांचे वीज बिल आले होते. अचानक एवढ्या मोठ्या रक्कमेचे वीज बिल आल्यामुळे गायधणे अस्वस्थ झाले होते. त्यांनी बिल कमी करावे या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयात तक्रार केली होती. पण, अनेकदा प्रयत्न करुनंही वीज बिल कमी झालं नाही.
'त्या' चाचण्या चुकीच्या, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
वीज बिल भरले नसल्याने वीज खंडीत होण्याची गायधणे यांना भीती होती. त्यामुळे त्यांनी स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. परंतु, गायधणे यांच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ग्राहकांच्या वाढीव वीज बिलाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. यासंदर्भात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'काही टक्के सूट देऊ हा प्रश्न निकाली निघणारा नाही. चार महिन्यांच्या लॉकडाऊन काळामध्ये 300 युनिटपर्यंत प्रती महिना, चार महिन्याचे बाराशे युनिट इतकं वीज बिल मध्यम परिवाराच माफ करावे.'
तसंच, 'मध्यमवर्गीय कुटुंबाचे 300 युनिट 4 महिन्याचे 1200 युनिट इतक वीज बिल माफ केले नाही, तर वीज कनेक्शन कापण्याकरिता आलेल्या कर्मचाऱ्यांना वीज कनेक्शन कापू देऊ नका', असा इशाराही बावनकुळे यांनी दिला होता.