जळगाव, 27 मे: कोरोना ही जागतिक महामारी आहे. ती महाराष्ट्राने आणली नाही. राजकारणाची ती व्यवस्था नाही. याचा सामना करण्यासाठी सर्वांनी सरकारला साथ देण्याची गरज आहे. उपाययोजनांत त्रुटी राहत असतील तर त्या लक्षात आणून दिल्या पाहिजे; पण असं न करता राज्यपालांकडे जाऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणे योग्य नाही.
हेही वाचा..खिसे तपासण्यावरून भाविकाची हत्या, रक्तानं माखलेल्या कपड्यात शिवसेना नेता अटकेत
शिवसेनेमुळेच नारायण राणे मोठे झाले आणि ते रस्त्यावर आले, असा टोला शिवसेना नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राणे यांना मंगळवारी लगावला आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या नारायण राणे यांना हे वागणे शोभत नाही, असंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ठाकरे सरकारवर टीका केली होती. कोरोनाचा सामना करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राणे यांनी केली होती. राणेंच्या या भूमिकेचा गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला.
राज्याचे कृषिमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत जळगावात होणाऱ्या आढावा बैठकीपूर्वी अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना त्यांनी राणेंना प्रत्युत्तर दिले. राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल तर महाराष्ट्रासोबत गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्लीतही लागू करावी. इतर राज्यांमध्येही ती लागू केली पाहिजे. कोरोनाच्या आपत्तीला राजकारणाचा रंग न देता समाजसेवेच्या माध्यमातून, प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या आपत्तीवर मात कशी करता येईल? या दृष्टीने सूचना त्यांनी द्याव्या.
हेही वाचा.. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीबद्दल नारायण राणेंचा मोठा खुलासा
राणेंचे शिवसेनेशी जुने नाते आहे. शिवसेनेमुळेच ते मोठे झाले आणि शिवसेनेमुळेच रस्त्यावरही आले. त्यामुळे शिवसेनेशी त्यांचे प्रेमाचे नाते असल्याचेही पाटील म्हणाले.