किरण मोहिते, प्रतिनिधी
सातारा, 18 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. लॉकडाउन लागू झाल्यामुळे मुंबईतील अनेक जण आपल्या गावी पोहोचले होते. परंतु, सातारा जिल्ह्यातील जावली गावात आलेल्या कुटुंबातील 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून मृत्यू झालेल्या मुलाचा मृतदेह कुटुंबीयांनी तब्बल सहा दिवस घरातच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सातारा जिल्ह्यात जावली तालुक्यातील म्हाते खृर्द गावातील एक कुटुंब हे अनेक वर्षांपासून कामानिमित्त मुंबईमध्ये राहत होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 27 मार्चला हे कुटुंब आपल्या 15 वर्षीय मुलासह मुंबईवरून आपल्या गावी आले होते. त्यांचा पंधरा वर्षीय मुलगा हा गेल्या सात ते आठ महिन्यांपासून आजारी होता. मुंबईवरून येवून दीड महिना उलटल्यानंतर पंधरा वर्षीय मुलाचा घरातच मृत्यू झाला.
हेही वाचा -आजपासून तुमच्या शहरात काय उघडणार आणि काय राहणार बंद, वाचा लॉकडाउन 4.0
मात्र, मृत्यू झाल्यानंतरही कुटुंबीयांनी याबाबतची माहिती पोलीस यंत्रणेला दिली नव्हती. घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या घरात जावून पाहिले असता 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. या घटनेची माहिती नागरिकांनी मेढा पोलिसांना कळवली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्थवचा मृतदेह ताब्यात घेतला असून हॉस्पिटलमध्ये शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यू कशाने झाला आहे, याचा उलगडा होणार आहे.
मात्र, मृत्यू होवून सहा दिवस मृतदेह घरात ठेवल्याने मुलाच्या मृत्यूबद्दल सस्पेन्स निर्माण झाला असून हा मृत्यू नैसर्गिक, आत्महत्या, खून की कोरोनामुळे हे मात्र उद्या सकाळीच स्पष्ट होणार आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.