मुंबई, 12 जानेवारी : बुधवारी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल अडीच तास बंद दाराआड चर्चा झाली. एकीकडे वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती होणार असल्याच्या बातम्या येत असतानाच आता दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांशी अडीच तास बंद दाराआड चर्चा केल्यानं राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर आणि आमचीही भेट झाली आहे. आम्ही दिल्लीत देखील भेटलो होतो असं राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी नेमकं काय म्हटलं? संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर आणि आमची देखील भेट झाली आहे. आम्ही यापूर्वी देखील दिल्लीला भेटलो आहोत. अशा बैठका या छुप्या नसतात, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे. शिंदे, फडणवीसांना टोला दरम्यान संजय राऊत यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. गुंतवणुकीबाबत आताच राज्य सरकार गंभीर नाही. गंभीर असते तर डाओसचा दौरा पुढे ढकलला नसता. पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे डाओसचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. मात्र पंतप्रधान मोदी हे आपलेच आहेत, ते कधीही महाराष्ट्रात येऊ शकतात. त्यांचा दौरा पुढे ढकलता आला असता. मात्र या सरकारला फक्त महापालिका निवडणुका महत्त्वाच्या असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







