मुंबई, 03 डिसेंबर : उदयनराजे गेल्या काही दिवसांपासून आक्रमक असून ते महाराष्ट्राच्या भावना व्यक्त करताहेत. छत्रपतींच्या अपमानामुळे उदयनराजे भावनाविवश असून आम्ही सर्व त्यांच्याशी सहमत आहे. मात्र त्यांच्याच पक्षाने छत्रपतींचा अपमान केला आहे. त्याबद्दल पक्ष साधी माफी मागायला तयार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलीये.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिर्डीत सपत्नीक साई दर्शनाला हजेरी लावली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी उदयनराजेंचे समर्थन करत राज्यसरकारवर जोरदार टीका केलीये. पैगंबराविषयी बोललेल्या नुपूर शर्मावर लगेच कारवाई झाली. मग छत्रपतींचा अपमान करणारावर कारवाई का नाही? असा प्रश्न उपस्थित करत भाजपमध्ये ठरवून छत्रपतींचा अपमान करण्याची स्पर्धा सुरु असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.
भाजप राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केलं नसल्याचं सांगत असले तरी त्यांनी निषेधही केला नाही. समर्थन न करणे म्हणजे निषेध नाही. तुम्ही धिक्कार केला नाही की कारवाईची मागणी केली नाही, हा तुमचा नामर्दपणा आहे. राज्यपालांचे समर्थन केलं नाही हा भाजपचा खुलासा आमच्या जखमेवर मिठ चोळणारा असल्याचे संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा : ‘ठिणगी पडताच होत्याच नव्हतं होईल’, धोकादायक तारांमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
कर्नाटकच्या सरकारने वातावरण बिघडवण्यासाठी योजनाबद्ध आराखडा केलाय. बेळगाव कारवार प्रश्नावरून लक्ष दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. छत्रपतींच्या अपमानाबद्दल महाराष्ट्रात जो रोष निर्माण झालाय त्यावरून लक्ष विचलीत करण्याचा देखील हा प्रयत्न आहे. महाराष्ट्र भाजप आणि कर्नाटक भाजपाने केंद्राच्या मदतीने हा प्रश्न उकरून काढलाय असा आरोप करत राऊत यांनी सिमा प्रश्नाकडे गांभिर्याने बघण्याची गरज असल्याचे म्हंटलंय. या संबधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करताहेत असा सवाल देखील संजय राऊत यांनी जत तालुक्यातील जनतेच्या प्रश्नावर उपस्थित केलाय.
राज्यपालांना टकमक टोकाहून ढकलून द्यावे ही उदयनराजेंची मागणी महाराष्ट्राची भावना आहे. साडेतीनशे वर्षापासून टकमक टोकाचा वापर झाला नाहीये या निमित्ताने तो व्हावा असे संजय राऊत म्हणालेत.
हे ही वाचा : कांद्याच्या दरात का होतेय घसरण, सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बळ देणार का?
या अगोदर बेळगावमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आंदोलने केली. जर आता दोन मंत्र्यांना जाता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. खरंतर मुख्यमंत्र्यांनी जायला पाहिजे. मंत्र्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाता येत नसेल तर फाळणी झालीय का? हा काय भारत पाकिस्तान आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. आमचा लढा कर्नाटकच्या जनतेशी नसून मानवतेचा आहे. अनेक दशकांपासून कर्नाटकात मराठी बांधवांवर अत्याचार सुरू असल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी दिलीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News, Maharashtra political news, Sanjay raut, Udayan raje bhosle