स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 15 जून: कृष्णा नदी ही सांगली जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे. याच नदीवर सांगली शहराजवळ ऐतिहासिक आयर्विन पूल आहे. ब्रिटिशांच्या काळात बांधलेल्या या पुलाला 93 वर्षांचा इतिहास आहे. 1929 पासून हा पूल सांगली शहर आणि जिल्ह्याला समृद्ध, सधन बनवण्यात आपलं योगदान देतोय. अनेक ऐतिहासिक घटना आणि घडामोडींचा साक्षीदार असणारा हा पूल आजही डौलानं उभा असून त्याला पाहणाऱ्याला भूरळ घालतोय. ब्रिटिशांनी पूल बांधलाच नाही सांगलीच्या आयर्विन पुलाची निर्मिती ब्रिटिश काळात झाली. मात्र, हा पूल ब्रिटिशांनी बांधला नाही. तर सांगलीचे राजे पटवर्धन यांनी बांधून घेतला. तत्कालिन ब्रिटिश अधिकारी आयर्विन यांनी राजे पटवर्धन यांना राजवाडा बांधण्यासाठी निधी मंजूर केला होता. मात्र, त्यांनी राजवाडा बांधण्याऐवजी सांगली-पुणे वाहतुकीत सुलभता यावी यासाठी कृष्णा नदीवर पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राजवाडा बांधण्यासाठी मंजूर केलेल्या रकमेत जवळची काही रक्कम जमा करून पूल बांधून घेतला. या पुलाच्या निर्मितीचे काम पुण्यातील रानडे कन्स्ट्रक्शन कंपनीकडे होते, असे अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पटवर्धन यांनी सांगितले.
93 वर्षांपासून पूल सांगलीकरांच्या सेवेत ब्रिटिश काळात 1927 मध्ये या पुलाच्या निर्मितीस सुरुवात झाली आणि दोनच वर्षात तो बांधून तयार झाला. ब्रिटिश अधिकारी आयर्विन यांनी मंजूर केलेला निधी आणि त्यांच्याशी असणारा स्नेह यामुळे पुलाला आयर्विन पूल असे नाव देण्यात आले. 1929 पासून म्हणजेच गेली 93 वर्षे हा पूल सांगलीकरांच्या वाहतुकीचा भार सोसत आहे. ब्रिटनहून पत्र आल्याची अफवा आयर्विन पुलाबाबत काही अफवा येत असतात. लंडनहून महापालिकेला एक पत्र आले आहे. त्यात पुलाला 100 वर्षे झाली असून आता आमची जबाबदारी संपली आहे, अशीही एक अफवा पसरली होती. मात्र, हा पूल ब्रिटनच्या कंपनीने नाहीतर भारतीय कंपनीने बांधला. त्याच्या दगडांच्या घडणीचे काम हे सांगलीतील पाथरवटांनी केले आहे आणि 2029 मध्ये हा पूल 100 वर्षांचा होईल, असेही पटवर्धन यांनी सांगितले. कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर अचानक पोहोचले अग्निशमन दलाचे जवान, एकच धावपळ, नेमकं काय घडलं? Video पूल अजून 50 वर्षे सुस्थितीत राहणार या पुलावरून गेल्या काही वर्षांपासून अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी पर्यायी पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे या पुलाचे आयुष्यमान वाढण्यास मदतच होणार आहे. सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर या पुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. अजूनही 50 वर्षे हा पूल सुस्थितीत राहील असा त्यांचा अहवाल आला आहे, अशी माहिती पटवर्धन यांनी दिली. दरवर्षी होतो पुलाचा वाढदिवस आयर्विन पूल हा सांगलीचे भूषण आहे. गेल्या 93 वर्षांपासून हा पूल लोकांच्या सेवेत आहे. तो अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदारही आहे. त्यामुळे या पुलाचा दरर्षी वाढदिवस साजरा केला जातो. सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक मुकुंद पटवर्धन हे आयर्विन पुलाचा वाढदिवस साजरा करत असतात.

)







