सांगली, 05 जानेवारी : महापूर, अतिवृष्टी, ऊन वारा या सर्वांवर मात करत जिद्दीने पिकवलेल्या शेती मालाला सध्या भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मकर संक्रांतीच्या तोंडावर मागील वर्षी 120 रुपये किलोने विक्री झालेल्या वांग्याला सध्या किलोला 10 ते 15 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची आवक वाढल्याने दर उतरले आहेत. यामुळे ग्राहकांना जरी दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र फटका सहन करावा लागत आहे.
रखरखत्या उन्हात पाण्याचा काटकसरीने वापर करून राबराब राबत पिकवलेली वांगी आता फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या फळभाजीला बाजारात भाव नसल्याने शेतकऱ्यांना वांग्यांची तोडणीही करणे पुरेनासे झाले आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक वांगी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
भाजीपाला वर्गीय पिकांत मागील काही वर्षांपासून बारमाही उत्पादन मिळणारे आणि सर्वाधिक मागणी असणाऱ्या वांग्याच्या पिकाची गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे.
पिकांवर मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. वरचेवर पाणी आणि खते देण्यासह तीन वेळा फवारणी केल्याशिवाय झाडांना फळधारणाच होत नाही. तथापि, या फळभाजीचा उठाव मोठा असल्याने सिंचन सुविधा असलेले शेतकरी या पिकाचा आधार घेत असतात.
सणाच्या तोंडावर दरात घसरण
वारणा आणि कृष्णा काठच्या शिवारात भाजीपाला पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी वांग्याची लागवड केली आहे. परंतु गेल्या दीड महिन्यापासून वांग्याचे दर मोठ्या प्रमाणात घटले. त्यातच काही दिवसांवर मकर संक्रांतीचा सण आला आहे. या संक्रांत मध्ये मोठ्या प्रमाणात भाज्यांचा वापर केला जातो. गेल्या वर्षी 120 रुपये किलो असणारी वांगी यंदा मात्र 10 ते 15 रुपये किलोने शेतकऱ्यांना विक्री करावी लागत आहे. त्यामुळे लिलावातही शेतकऱ्यांच्या वांग्यांना मागणी नसून, शेतकऱ्यांना आता शेतामधील वांग्यांच्या तोडणीवर खर्च करणेही परवडत नसल्याचे चित्र दिसत आहे.
Makar Sankrant : हलव्याच्या दागिन्यांमध्ये यंदा काय आहे ट्रेन्डिंग? पाहा Video
भाजीपाल्याचे उत्पन्न वाढले
शहरातील आठवडी बाजारात भाजीपाल्यांच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. महिन्यापासून आठवडी बाजारात भाजीपाल्याची आवक वाढू लागल्याने भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान समाधानकारक झाल्याने जलसाठ्यात मोठी वाढ झाली. त्यामुळे शेतकरी हंगामी पिकाबरोबर भाजीपाला पिके देखील घेत आहेत.
वाहतूक खर्चही निघेना
गेल्या महिन्यापासून बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक वाढत असल्याने भाजीपाला मातीमोल विक्री करावा लागत आहे. भाजीपाल्याचे दर घसरल्यामुळे बाजारात आणण्याचा वाहन खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. भाजीपाला लागवडीपासून ते काढणीपर्यंत मोठा खर्च होतो. बाजारात भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने भाजीपाला उत्पादक चिंता व्यक्त करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.