मुंबई, 08 सप्टेंबर : मागच्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरा लावली. कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान घातले होते. दरम्यान पुढचे 5 दिवस राज्यात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात आज (दि.08) जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
तर उद्या (दि.09) ऑक्टोबर रोजी पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, लातूर, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नाशिक, नंदूरबार या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील काही भागांत 11 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : कापसाचे भाव उतरले, हिवाळ्यात कपडे खरेदी स्वस्त होणार का?
मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि परिसरात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. डोंबिवलीमध्ये सकाळपासून 94.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, मुंबई मध्य आणि पूर्व उपनगरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.
देशातील अनेक भागात सध्या पाऊस सुरु आहे. गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, पुढील 3 ते 4 दिवस कर्नाटकचा अंतर्गत भाग, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु आहे. आग्रा, ग्वाल्हेर या भागातून मान्सून माघारी परतला आहे.
परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान
पावसाला पोषक हवामान असल्याने उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यात राज्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस सुरूच आहे. कमी कालावधीत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाणीच पाणी होत असून, नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. सततच्या पावसाने पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
हे ही वाचा : शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार, जुन्या पद्धतीनेच अतिवृष्टीची नुकसान भरपाई देणार
मागच्या 24 तासांत उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी ही झाली. लगतच्या देऊळगाव माळी (ता. मेहकर, जि. बुलडाणा) मंडळात अतिवृष्टी झाल्याने व पेनटाकळी प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडल्याने पैनगंगेला पूर आला. सोयाबीन, तूर, कपाशी, मका पिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे.