मुंबई, 23 ऑगस्ट: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray)यांची महाराष्ट्रातील प्रमुख गोविंदा पथकांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण-वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. बैठकीस उपस्थित प्रतिनिधींनी देखील या कळकळीच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत दहीहंडीऐवजी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेण्याच्या भावना व्यक्त केल्या.
काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहिजेत... पण आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारच प्राधान्यांना करावा लागेल, असं मुख्यमंत्री बैठकीत म्हणालेत.
तसंच आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा. बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्या वर्षी पासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत. त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावं. व्हॅक्सिन घेतल्यावर देखील काही देशांत लॉकडाऊन करण्यात आलंय. इस्त्रायलने तर पुन्हा मास्क घालायला सुरवात केलीय. अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे. कारण अनेकांची हातावर पोट आहेत. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ आहे. एकदा हे संकट पूर्णपणे घालवूयात. आपण यंत्रणेत कुठेही ढिलाई होऊ देत नाही आहोत. नीती आयोगाने जे सांगितलंय. ते लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या दिड वर्षात आपण जी आरोग्य सेवा वाढवलीय ती इतर कोणत्याही राज्याने वाढवलेली नसल्याचंही ते म्हणालेत.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, आपण दुसऱ्या लाटेत डॉक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलोय. आता जी विंडो आपल्याला मिळालीय. तीचा वापर आपण थोडं अर्थ चक्र सावरण्यासाठी करूयात. पुन्हा ती काळरात्र नकोय. जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपरा देखील काहीवेळ समजूतीने गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचे पाऊल उचलावं लागेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, तिसरी लाट जगातील अनेक देशांत आलेली आहे. सर्व धर्मियांच्या सणांना महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या सुरक्षेची काळजी घेत निर्णय घेतले त्याला जनतेनेही सहकार्य केले. जे आता पर्यंत आपण सगळं सांभाळलंय. त्यामुळे आपल्याला कठोर भूमिका घ्यावी लागेल. मर्यादीत स्वरूपात करण्याची मागणी होतेय. पण तेही धोकादायक ठरू शकते. आपण सर्वांनी सहकार्य करावे.
महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील Video conferencing द्वारे संवाद साधला.
दहीहंडी समन्वय समितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करता गोविदा पथकांनी कोविड 19 संसर्गासाठी मदत मोहीम सुरू करावी, असं आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. तर मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, पोलीस, प्रशासन, सरकार, यांना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी घेत नियम थोडे लवचिक करत पारंपारिक दहीहंडी गोविंदा पथकांना जागेवरच फंडी फोडण्याची परवानगी द्यावी.
बायकोच्या घरच्यांचा त्रास सहन न झाल्यानं तरुणाची आत्महत्या, CMकडे केली ही मागणी
मुंबई पोलीस आयुक्तांचं मत
गेले काही महिने आपण निर्बंधात असल्यामुळे आपण दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवू शकलो आहे. आता दहीहंडी नतर लगेच गणेशोत्सव येणार आहे. आपण आता दहीहंडी उत्सवाला थोडी शिथिलता दिली तर पुढे गणेशोत्सव मंडळं देखील थोडी शिथिलता मागतील. त्यामुळे आपण आता सावध भूमिका घेतली पाहिजे, असं मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.