'राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बिहारच्या राजकारणाचा दाखला दिला होता. एवढंच नाही तर पाटील यांनी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बोलून दाखवली होती. शिवसेनेला उपरती झाली, तर ते येतील, आम्ही हात पुढे केला असा त्याचा अर्थ नाही, भविष्यातील या राजकीय शक्यता असल्याचे ते म्हणाले होते. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव केली आहे. शिवसेनेला आम्ही कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. किंवा शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं आहे. भाजप आता स्वत:च्या ताकदीवर यापुढे असेल, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे सरकारवर आरोप... सत्ताधाऱ्यांनी कोरोना काळात 'बॉडी बॅग'चा भ्रष्टाचार केला आहे. मृतांच्या टाळू वरील लोणी खाण्याचं काम केलं आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. हा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार असून तो आपल्याला उघड करावा लागणार आहे. ही खूप मोठी लढाई आहे. ती आपल्याला हा भ्रष्टातार उघड करायचा आहे. त्यासाठी सज्ज राहा, असंही चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकीत भाजप कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही, असा पवित्राच भाजपने घेतला आहे. यापुढे राज्यात निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. एकेकाळी 25 वर्ष सोबत होता त्या शिवसेनेसोबत युतीची शक्यता मावळली आहे. त्यामुळे आगामी काळात जर राजकीय परिस्थिती बदलली तरी शिवसेनेसोबत युती करणार नाही, असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच, मध्यंतरीच्या काळात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत गुप्त बैठक झाली होती. त्यानंतर अचानकपणे मनसेनं मेकओव्हर करत हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे मनसे आणि भाजप एकत्र येतील अशी राजकीय चर्चा उघडपणे रंगली होती. सोमवारी भाजप पक्षाच्या कार्यकारिणीला सुरुवात झाली होती. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राज्य भाजपला स्वबळावर सत्ता आणण्याचं आवाहन केलं होतं. हेही वाचा... स्वार्थाकरता एकत्र... 'महाराष्ट्रात स्वार्थाकरता एकत्र येऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे हे सरकार आहे. या सरकारनं कोरोना परिस्थितीमध्येही भ्रष्टाचार केला आहे. त्यांचे कारनामे हे लोकांसमोर आणले पाहिजे. मुळात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या स्वार्था करता एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केले आहे. येणाऱ्या काळात कुणाचाही मदत न घेता सत्तेत येण्यासाठी तयारी करा' असा आदेशच नड्डा यांनी कार्यकर्त्यांना दिला होता.आतातरी राजकारण थांबवा!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 29, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit pawar, Shiv sena