सांगली, 22 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील हे त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावामुळे प्रचलित आहेत. त्यांनी आपल्या विरोधकांवरदेखील फार टोकाची टीका केली असेल असं क्वचितच घडलं असेल. त्यांच्या स्वभावामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरयुक्त जागा आहे. पण शांत आणि संयमी जंयत पाटील यांना आज अखेर कोर्टाची पायरी चढावी लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामागे कारणही अगदी तसंच आहे. जयंत पाटील यांच्याविरोधात एका प्रकरणी इस्लामपूर न्यायालयाने वॉरंट काढलं होतं. त्यामुळे पाटील यांना आज कोर्टात हजर राहावं लागलं.
नेमकं प्रकरण काय ?
जयंत पाटील यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाच वर्षांपुर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देवूनही ते न्यायालयात हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधात वॉरंट काढण्यात आले होते. आमदार जयंत पाटील यांनी न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीनाची पुर्तता केली आहे. जयंत पाटील यांच्या राजकीय जीवनात प्रथमच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्यांना जामीनासाठी स्वतः न्यायालयात हजर राहण्याची वेळ आली आहे.
(अचानक बुलेरो आली, कारला धडकली, पाहता-पाहता फुटपाथवर चढली आणि मोठा गदारोळ, नागपुरात विचित्र अपघात)
गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी जयंत पाटील यांनी शिगाव येथे रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. मुंबई पोलीस अधिनियमानुसार जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आष्टा पोलिसात जयंत पाटील यांच्यासह स्वरुपराव पाटील, मधुकर पाटील, रणजित पाटील, शरद गायकवाड, मोहन गायकवाड, राजेंद्र भासर, विलासराव शिंदे, जितेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी इस्लामपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देवूनही न्यायालयात हजर न राहिल्याने जयंत पाटील यांच्याविरोधात वॉरंट काढले होते. त्यामुळे जयंत पाटील शुक्रवारी (22 जुलै) दुपारच्या सुमारास इस्लामपूर न्यायालयात हजर राहिले. त्यांनी न्यायालयात हजर राहून वॉरंट रद्द करत जामीनाची पूर्तता केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.