नाशिक, 28 जुलै : नाशिक शहरातील त्रिमूर्ती चौक ( Trimurti Chowk In Nashik ) परिसरातील पथदिवे ( Street lights ) काही दिवसांपासून बंद असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य ( Empire of Darkness )निर्माण झाले आहे. शहरात एकीकडे चोरीच्या घटना वाढत असताना दुसरीकडे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे पथदिवे बंद असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वारंवार महावितरणला सांगूनही पथदिवे दुरुस्त होत नसल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी केला आहे.
त्रिमूर्ती चौक परिसरातील पथदिवे काही दिवसांपासून बंद आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांना पायी जाण्यास त्रास होत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून वाहन सुसाट जातात. त्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे येथील पथदिवे महावितरण प्रशासनाने लवकरात लवकर दुरुस्त करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी केली आहे.
हेही वाचा : Pune : सावधान! पुण्याला स्वाईन फ्लूचा विळखा; धोका टाळण्यासाठी अशी घ्या काळजी, पाहा VIDEO
पथदिवे बंद असल्यामुळे बाहेर जाण्यात वाटते भीती
रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने याचा आम्हाला रात्रीच्या वेळी खूप त्रास होतो. परिसरात अंधार असतो. त्यामुळे बाहेर जाण्यात भीती वाटते. शहरात आधीच चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरटे अंधाराचा फायदा घेत लुटतात. त्यामुळे तात्काळ या परिसरातील पथदिवे दुरुस्त करावेत, अशी मागणी स्थानिक रहिवासी सिंधू सोनवणे यांनी केली आहे.
खूप पावसात आम्ही समजू शकतो मात्र पाऊस कमी झालेला असतानाही पथदिवे दुरुस्त केले जात नाहीत. काही पथदिवे तर झगमग करत असतात सतत चालू बंद होतात. यामुळे वाहन चालकांना त्रास होतो असच सुरू राहीले तर मोठा अपघात होऊ शकतो हा रस्ता सतत वर्दळीचा आहे. हजारो वाहन दररोज इथून रात्रीच्या वेळी जातात. एखाद्या नागरिकाला वाहनाने उडवल्यावर या अधिकाऱ्यांना जाग येईल का ? अशा संतप्त शब्दात स्थानिक रहिवासी यतीन फडोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पोलिसांची देखील रस्त्यावरील पथदिवे दुरुस्तीची मागणी
रस्त्यावरील किंवा परिसरातील पथदिवे बंद झाले तर सबंधित विभागाने त्याची लवकर दुरुस्ती केली पाहिजे. अंधार असला तर नागरिकांना असुरक्षित वाटते तसेच चोरांचे देखील फावते अंधाराचा फायदा घेत शहरात बऱ्याच ठिकाणी सोन साखळ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासने पथदिवे लवकरात लवकर दुरुस्त करावे, अशी मागणी पोलीस प्रशासनाने केली आहे.
हेही वाचा : Nashik: आर्थिक परिस्थितीशी झगडत 21 व्या वर्षी CA बनलेल्या ओमकारनं सांगितला यशाचा मंत्र
या टोल फ्री नंबरवर करा तक्रार
दरम्यान, या संदर्भात महावितरण विभागाशी संपर्क साधला असता तुषार कुलकर्णी यांनी तत्काळ पथदिवे दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. तसेच 1800123338811 हा टोल फ्री नंबर देखील दिला आहे. शहरातील पथदिवे बंद झाल्यास या नंबरवर आपण तक्रार देऊ शकता. तक्रार मिळाल्यास काही वेळातच आपला परिसरातील पथदिवे दुरुस्त केले जातील, असे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.