मुंबई, 03 डिसेंबर : राज्यात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. यामुळे आशियातील सर्वात मोठी कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. दरम्यान अवकाळी पाऊस, राज्य सरकारची धोरणे यामुळे पुन्हा नाशिक जिल्ह्यातच कांदा शेतकऱ्यांना रडवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसात हे दर आणखी खाली कोसळतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पंधरा दिवसांपूर्वी ज्या उच्च प्रतीच्या कांद्याला क्विंटलला तीन ते चार हजार रूपये भाव मिळत होता, तोच कांदा आज व्यापाऱ्यांकडून दीड ते दोन हजार रुपयांनी खरेदी केला जात आहे. यामुळे नाशिकमध्ये कांद्याचे दर पडल्याचे दिसत आहे. हा कांदा दर पडल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संताप व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : Nashik : टोमॅटोने शेतकऱ्याला रडवलं..ऐका तरुण महिला शेतकऱ्याची व्यथा, Video
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळावं
मागच्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगितलं होत. परंतु कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने याकडे कोण लक्ष देणार का? असा सवालही शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान कांद्यापाठोपाठ राज्यात टोमॅटो उत्पादक शेतकरीही संकटात सापडला आहे. टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याने टोमॅटोला कवडीमोल दराने भाव मिळत आहे. कांदा आणि टोमॅटोच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या हातात चार पैसेही राहत नसल्याचे सध्या चित्र आहे.
राजस्थानमधील नवीन कांद्याची होणारी आवक, मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आलेला कांदा, यासोबतच कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी उशिरा केलेली कांद्याची लागवड याचा परिणाम म्हणून उन्हाळी कांद्याचे दर कोसळले असून येत्या काही दिवसात हे दर आणखी खाली येतील अशी भीती व्यक्त केली जातीय. असे झाले तर कांदा उत्पादक शेतकरी आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : ‘ठिणगी पडताच होत्याच नव्हतं होईल’, धोकादायक तारांमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला
सरकारने काय करायला पाहिजे
नाशिक जिल्ह्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. कांद्याची प्रतही उत्तम असल्याने या कांद्याला देशभरातून चांगली मागणी असते. कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलो ला 22 ते 25 रुपये येतो. मात्र सध्या हा खर्चही निघत नसल्याने बळीराजासमोर आर्थिक संकट उभं राहीले आहे. हे नुकसान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त कांदा परदेशात निर्यात करावा, तसेच काही महिन्यांपासून ज्यांनी आपला कांदा कमी दरात विकलेला आहे त्यांना दहा रुपये प्रति किलो याप्रमाणे नुकसान भरपाई अनुदान द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Farmer protest, Nashik, Onion