नागपूर, 29 जुलै : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस सामनाचे संपादक संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी भाजप तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला हाणला आहे. ‘उद्धव ठाकरेंची जी घरगुती मुलाखत आहे, त्यातलं एकही वाक्य प्रतिक्रिया देण्या लायक नाही, त्यामुळे माझा वेळ त्याकरता घेऊ नका’, असा निशाणा देवेंद्र फडणवीस यांनी साधला आहे. दोन भागांमध्ये झालेल्या या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडले. 2024 साल आपल्या देशाच्या आयुष्याला नवे वळण देईल, असं उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणाले. तसंच ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्यही शेवटी मावळलाच. प्रत्येकाचा शेवट हा होतोच. हा निसर्ग नियम आहे. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स हे तीन पक्षसुद्धा आता ‘एनडीए’त सामील झाले. हीच त्यांची ताकद आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी टीका केली. शिवसेनेने खंजीर खुपसला, मी खंजीर खुपसला म्हणताय, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की तुम्ही त्यांना पण फोडलंत? तुमचं सरकार आलं होतं ना, शिवसेना फोडून. शिवाय अपक्षही सोबत घेऊन तुमचं सरकार मजबूत झाल्यानंतरही पुन्हा राष्ट्रवादी का फोडलीत? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला होता.
एवढी मोठी दुर्घटना घडलेली असताना मुख्यमंत्री मुजरा मारायला दिल्ली दरबारी गेले आहेत. पहा, फोटो प्रसिद्ध झालेत. कुणाला मुजरा मारताय? कशासाठी मुजरा मारताय? ज्यांना मुजरा मारायला गेला आहात त्यांच्या डबल इंजिन सरकारमध्ये देशात काय चाललंय? राज्यात एवढी मोठी दुर्घटना घडली आहे, आपत्ती ओढवली आहे, दरड कोसळली आहे तरीदेखील हे दिल्ली दरबारी मुजरा मारायला जाताहेत. हे असे हुजरे राज्याला काय न्याय देणार? असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केला. समृद्धी महामार्गावर इतका मोठा अपघात झाला. त्या अपघातातील मृतांच्या चिता धगधगत असताना इथे शपथविधी झालाय. चितांचा धूर विझलेला नसताना मंत्रीपदाच्या शपथा घेतल्या जातात हा विषय खूप गंभीर आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.