मुंबई, 01 ऑगस्ट : ‘राज्यपालांच्या विधानावरून संतापाचा भडका उडाला. तो भडका व रोष कायम असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ‘ईडी’ने रविवारी पहाटे धाडी टाकून राज्यपालांच्या भीषण वक्तव्यावरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न केला. हे अपेक्षित होतेच. राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या वक्तव्यावर पाणी ओतण्यासाठी महाराष्ट्रात अशा कारवाया सुरू केल्या तरी विझणार नाही. संजय राऊत यांनी राज्यपालांच्या विधानाचा प्रखर शब्दांत शनिवारी समाचार घेतला व रविवारी सकाळी त्यांच्या घरी ‘ईडी’ची पथके पोहोचली. लोक काय ते समजून गेले, असं म्हणत शिवसेनेनं राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनेचे खासदार आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. पण अटकेनंतरही सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. या अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ‘घटनात्मक पदावर बसून मुंबई-महाराष्ट्राच्या नागरिकांत जात-प्रांताची भेदाभेदी करणारी विधाने राज्यपाल कोश्यारी करीत आहेत. राज्यपाल मात्र जात-प्रांतात भेदाभेदी करून महाराष्ट्रात व हिंदुत्वात फूट पाडत आहेत. त्यामुळे कोश्यारी यांना राज्यपाल म्हणायचे की आणखी काही, असा प्रश्न मराठी माणसाला पडला असेल तर तो चुकीचा कसा म्हणता येईल! गुजराती, राजस्थानी, हिंदी भाषिक लोक यांना वेगळे पाडून भाजपसाठी वेगळी ‘मतपेढी’ करण्याचे काम घटनात्मक पदावरील व्यक्ती करत असेल तर राष्ट्रीय एकात्मतेची ऐशी की तैशी व्हायला वेळ लागणार नाही, अशी टीका शिवसेनेनं केली. ( ‘ईडीला घाबरून आमच्याकडे किंवा भाजपकडे येण्याचं पुण्य..’; शिंदेंचा राऊतांना टोला ) ‘भाजप प्रत्येक गोष्ट पैसा, संपत्ती, व्यापारातच तोलतो. त्यामुळे त्यांना रक्त, घाम, अश्रूंचे मोल नाही. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढय़ात भाजप विचारांच्या लोकांचा सहभाग नव्हता. त्याचप्रमाणे मुंबईसह महाराष्ट्राच्या लढ्यातही भाजप परिवार कोठेच नसल्याने त्यांना मराठी अस्मिता कशाशी खातात ते माहीत नाही. मुंबईतील धनिक मंडळ हेच त्यांचे सर्वस्व आहे. बेळगावसह मराठी सीमा भागाविषयी त्यांना आस्था नाही. महाराष्ट्राचे दोन-तीन तुकडे पडले तरी भाजपचे मन अस्वस्थ होणार नाही. हा त्यांचा स्वभावधर्म, गुणधर्म आहे. त्यामुळे ‘‘राज्यपाल महोदयांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही,’’ असे थातूरमातूर शाब्दिक बुडबुडे त्यांनी हवेत सोडले आणि आपल्या तकलादू महाराष्ट्र निष्ठेचे पुन्हा एकदा प्रदर्शन घडविले’ अशी टीकाही शिवसेनेनं केली. ( India@75 : स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही भारताला राष्ट्रभाषा का मिळाली नाही? ) लोकमान्य टिळकांच्या अटकेनंतर मुंबई बंद पाडली व हाच कष्टकरी वर्ग ‘चले जाव’चे नारे देत गांधींच्या मागे उभा राहिला. त्यामुळेच ब्रिटिशांना गाशा गुंडाळावा लागला. राज्यपालांचे विधान श्रीमंत, उद्योगपतींची तळी उचलणारे आहे व शेतकरी-कष्टकऱ्यांचा अपमान करणारे आहे. राज्यपालांनी राजभवनाचे भाजप कार्यालय बनवून ठेवले आहे. अनेक घटनाबाहय़ कृतींचे ते केंद्र बनले आहे. राज्यपाल हे पूर्वाश्रमीचे संघ प्रचारक आहेत. त्याबद्दल वाईट वाटण्याचे कारण नाही, पण राजभवनात बसून सरकार पाडणे, काडय़ा घालणे, वादग्रस्त वक्तव्ये करणे हे योग्य नाही. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तिगत आयुष्याची खिल्ली उडविणारे राज्यपाल भाजपास प्रिय आहेत. ‘‘रामदासस्वामी नसते तर शिवाजी महाराजांना कोण विचारतो?’’ असे म्हणणारा माणूस भाजपने महाराष्ट्रावर राज्यपाल म्हणून लादला व त्याच राज्यपालांनी फुटीर शिवसेना गटास मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. आता तर घटनात्मक पदावर बसून मुंबई-महाराष्ट्राच्या नागरिकांत जात-प्रांताची भेदाभेदी करणारी विधाने राज्यपाल कोश्यारी करीत आहेत’ अशी टीकाही शिवसेनेनं केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.