मुंबई : ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे बिहार दौऱ्यावर आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची एक रणनिती म्हणून त्यांच्या या दौऱ्याकडं पाहिलं जात आहे. मात्र दुसरीकडे विरोधकांकडून आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता त्यांचा चेहरा वापरला जात आहे. मात्र त्यांचा स्वतःवर आणि वडिलांवर विश्वास उरला नाही. त्यांचे चेहरे बघून लोकं आता त्यांना मतं देणार नाहीत. असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. प्रभाग रचनेवर प्रतिक्रिया दरम्यान यावेळी त्यांनी मुबई महापालिका प्रभाग रचनेवर देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सगळ्या प्रक्रियेत नुकसान सामान्य माणसाचं होत आहे. प्रशासन मनमानी पद्धतीने काम करत आहे. आयुक्त मनमानी पद्धतीने काम करत आहेत. 227 वार्डाचे 236 करा पण निवडणूका घ्या. लोकांचा हा पैसा आहे, तो तुम्ही वाया घालवत आहात. जनता निवडणुकीमध्ये सगळं दाखवून देईल असं संंदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : आता कुठे आहे ते भाजपचे प्रवक्ते? आदित्य ठाकरेंची माफी मागा, शिवसेना नेत्याने भाजपला सुनावलं
राज्य सरकारने मतभेद सोडवावेत
दरम्यान पुन्हा एकदा कर्नाटक आणि महाराष्ट्राचा सीमा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. कर्नाटकेच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर मुख्यमंत्री बोम्मई यांनी दावा सांगितला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. यावर देखील संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतभेद राज्य सरकारने सोडवले पाहिजे. दावा ठोकल्याने काही होत नाही. निवडणुकीच्या काळात अशी वातावरण निर्मिती केली जाते. मात्र अशा गोष्टींना भीक घालायची गरज नाही असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.