कल्याण, 29 मार्च: राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. त्यात कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या 10 वर पोहोचली आहे. त्यात डोंबिवलीत आणखी एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत टेस्टिंग लॅब सुरू करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्र लिहून कल्याण-डोंबिवलीत टेस्टिंग लॅब सुरु करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, क्वारंटाइन लोक घराबाहेर फिरताना दिसल्यास त्यांना जेलमध्ये टाका, अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी केली होती.
डोंबिवलीमध्ये आणखी एका महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. ही महिला डोंबिवली येथील म्हात्रेनगर येथे हळद आणि पश्चिमेला लग्न समारंभात उपस्थित होती. या घटनेनंतर पोलिसांनी डोंबिवलीतील मढवी बंगला इथला परिसर पूर्णपणे लॉकडॉऊन केला आहे. कोरोनाच्या भीतीनं महापौर विनिता राणे यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. या लग्न समारंभाला महापौर आपल्या पतीसह उपस्थित राहिल्या होत्या. त्यामुळे या लग्न समारंभातील आणखी किती व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे यासंदर्भात शोध सुरू आहे. मुंबईसह ठाण्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. शनिवारपर्यंत 108 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती.
मिळालेली माहिती अशी की, म्हात्रेनगर इथे 18 मार्च रोजी हळद तर 19 मार्च रोजी जुनी डोंबिवली ग्राऊंड इथे विवाह समारंभ पार पडला. या समारंभात एक NRI तरुणही उपस्थित होता ज्याला कोरोनाची लागण झाली होती. या लग्न समारंभात महापौर आपल्या पतीसह अनेक नगरसेवकही उपस्थित होते. लग्नाला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. लग्नाला उपस्थित असलेल्यांपैकी नेमक्या किती जणांना लागण झाली आहे याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही मात्र पोलिसांकडून शोध सुरू आहे.