मुंबई, 15 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपचा दारूण पराभव केला आहे. या विजयानंतर देशभरातल्या विरोधकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्रातही कर्नाटकच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर ही बैठक झाली. उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे महाविकासआघाडीचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहिती दिली आहे. अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकाही होण्याची शक्यता वर्तवली आहे. ‘लोकसभेच्या 48 जागांचं वाटप करावं, विधानसभेच्या 288 जागांची चर्चा करता आली तर ती पण करावी, कारण काहींना लोकसभेसोबतच कदाचित महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील, असं वाटतंय. त्यामुळे निवडणुका लागल्यानंतर धावपळ व्हायला नको म्हणून त्याबद्दलची चर्चा झालेली बरी, अशी चर्चा काल झाली’, असं अजित पवार म्हणाले. ठाकरे गटाने प्रयत्न केले तरीही… अजितदादांचं शिंदे सरकारबद्दल मोठं विधान भाजपनं दावा फेटाळला दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र व्हायची शक्यता भाजपने फेटाळून लावली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्या अशी शक्यता वाटत नाही आणि का व्हाव्या? लोकसभेनंतर पुन्हा सहा-साडेसहा महिने विधानसभेला वाचतात. एकत्र होण्याचं काही कारणच नाही. आजतरी लोकसभा-विधानसभा एकत्र होणार नाही, असं आज तरी मी म्हणेन, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







