मुंबई, 2 मे: यंदा राज्यासह देशभरात उष्णतेच्या झळा मार्च महिन्यापासून जाणवू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरात तापमानाचा पारा 45 अंशावर पोहोचला आहे. हवामान खात्याच्या माहितीनूसार आणखी काही दिवस तरी या असह्य उकाड्याच्या चक्रातून लोकांची सुटका होणे कठीण आहे. हवामान विभागाने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याची माहिती दिली आहे. मुंबईत घामाच्या धारा
उष्ण आणि कोरड्या वार्यांमूळे मुंबईचे वातावरण आणखीच बिकट बनले आहे. एकीकडे मुंबईकर घामाने हैराण झाले आहेत तर दुसरीकडे पशू-पक्ष्यांचीही अवस्था दयनीय आहे. मुंबईत आज (दि.02) पारा 33 अंश सेल्सिअस एवढा राहिला. पुढील काही दिवस मुंबईत पारा 33 किंवा त्याहून अधिक राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. पुण्यात 37 °C°F अंश, कोल्हापूर 40 अंश, तर सोलापूर 39 अंश आहे. चंद्रपुरात मागच्या चार दिवसांपासून तब्ब्ल 46.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती दरम्यान आज 42 अंशावर तापमान आहे. मागच्या शंभर वर्षांत ही दुसर्यांदा उच्चांकी नोंद असून 26 वर्षांनंतर इतका पारा चढला आहे. यापूर्वी 30 एप्रिल 1996 ला 46.6 सेल्सिअस तापमान नोंदविले होते. अकोला, अमरावती, बह्मपुरी, नागपूर, वर्धा आणि यवतमाळचा पाराही ४५ च्या वर आहे.
तापमान दोन अंशांनी वाढण्याचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तापमानात दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये दिवसाचे तापमान दोन अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे पश्चिम बंगाल सरकारने २ मेपासून शाळांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर केली आहे.
हवामान खात्याकडून अलर्ट
हवामान विभागाने विदर्भ, पश्चिम राजस्थान आणि मध्य प्रदेशात उष्णतेच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर उर्वरित वायव्य भारत आणि मध्य भारतासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात उष्णतेचे सर्व विक्रम मोडीत निघताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.