मुंबई, 31 जुलै: राज्यानं (Maharashtra State) आताच अतिवृष्टीचा सामना केला. या अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती (Flood Affected Area) निर्माण झाली. तर बऱ्याच ठिकाणी दरड (Landslide) कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. या सर्व घटनांमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचं मोठं नुकसानं झालं आहे. या घटनांमुळे रस्त्यांचं सुमारे 1 हजार 800 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं हा अंदाज वर्तवला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील संपूर्ण विभागात अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये रस्ते आणि पुलांचे प्रचंड नुकसान झालं आहे. एकमेव कोकणात सर्वात जास्त तब्बल 700 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. त्यानंतर पुणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक विभागातही बरंच नुकसान झालं असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. ‘‘पूरग्रस्तांच्या मदतीला येण्याची इच्छा होती पण…’’, शर्मिला ठाकरेंकडून उलगडा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात जास्त नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील नुकसानीची पाहणी करण्यात येणार आहे. ही पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय मुख्य अभियंते आणि समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या काळात जवळपास 290 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते, असा प्राथमिक अंदाज आहे. तर 469 रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली होती. तर 140 पूल पाण्याखाली गेले होते. येत्या 3 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून नुकसानीच्या रकमेत आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







