मुंबई, 22 एप्रिल: गेल्या काही दिवसांपासून कोरोनासंदर्भातील विविध मुद्द्यावरून केंद्र सरकार (Central Government) विरुद्ध महाराष्ट् सरकार (Maharashtra Government) अशी जुंपलेली पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा रेमडेसिव्हीरच्या (Remdesivir Injection) मुद्द्यावरून राज्य विरुद्ध केंद्र असा वाद पाहायला मिळतो आहे. आवश्यक लशीचा (Coronavirus Vaccine) पुरवठ्यानंतर केंद्राने आता रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून रेमडेसिव्हीरचे वाटप जाहीर केले आहे पण महाराष्ट्राच्या वाट्याला जाणूनबुजून कमी रेमेडेसिव्हीर दिल्याचा दावा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून केला जात आहे. महाराष्ट्राला दिवसाला 50 हजार इंजेक्शन लागतात, राज्य सरकारने तशी मागणीही केली आहे. पण केंद्र सरकार आता केवळ 26 हजार इंजेक्शन दिले आहेत असा दावा नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्वीटद्वारे केला आहे. केंद्राने 50 हजार इंजेक्शनचा पुरवठा केला जावा अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जात आहे.
Central government has just released the allocation data of #Remdesvir injection to various states in our country.#Maharashtra requires 50,000 injections per day, which our government has been demanding.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 21, 2021
So far we have been receiving only 36,000 injections per day and now (1/3) pic.twitter.com/mVuwtBk3VU
आता गरजेच्या तुलनेन कमी इंजेक्शन देण्याच्या केंद्राच्या या भूमिकेवर कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्राचा छळ कशासाठी अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
#remdesivir ची दररोज महाराष्ट्र मधील मागणी 50000 ची
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 21, 2021
मोठ्या मुश्किलीने राज्य सरकार 33000 ते 36000 पुरवते आहे
आता केंद्र सरकारनी ताब्यात घेतले आत्ता महाराष्ट्राला मिळणार 26000
महाराष्ट्राचा असा छळ कश्या साठी ?
त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढत रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. महाराष्ट्रामधील रेमडेसिव्हीरची मागणी 50000 ची आहे, मोठ्या मुश्किलीने राज्य सरकार 33000 ते 36000 पुरवते आहे. आता केंद्र सरकारने ताब्यात घेतले त्यामुळे आता महाराष्ट्राला मिळणार 26000. महाराष्ट्राचा असा छळ कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वीच या इंजेक्शनच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांचे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस मधील नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड असा संघर्ष झाला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नाराजी व्यक्त करत बदलीची मागणी केली होती. अवघ्या दोन ते तीन तासांमध्ये अभिमन्यू काळे यांची त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बदली देखील केली. यानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात आली होती. आता परत एकदा केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा मुद्दा इंजेक्शनच्या तुटवड्यावरून समोर आला आहे. महाराष्ट्रामध्ये दररोज सात हजाराच्या आसपास कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये रुग्ण संख्या वाढत असताना इंजेक्शनची उपलब्धता करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत इंजेक्शन ऑक्सिजन या मुद्द्यावरून दररोज महाविकास आघाडी विरुद्ध केंद्रातील भाजप सरकार असा संघर्ष पेटला आहे. एका बाजूला भाजप आणि महाविकासआघाडी कडून आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे तर दुसरीकडे लोकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत आता. आरोप-प्रत्यारोपांचा खेळ बंद करा आणि लोकांना सेवा सुविधा द्या अशीच मागणी जनतेकडून होत आहे. किमान जनतेच्या अपेक्षा आरोग्याच्या सेवा सुविधा याकडे राज्यातील महाविकास आघाडी सरकार लक्ष देईल आणि त्याला भाजपाची केंद्रातील सरकार मदत करेल इतकीच माफक अपेक्षा महाराष्ट्रातील जनता व्यक्त करत आहे.