मुंबई, 25 नोव्हेंबर : राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Meeting) आज सह्याद्री अतिथीगृहावर (Sahyadri Guest House) बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील सर्व शाळा येत्या 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशना संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिवाळी अधिवेशन हे परंपरेनुसार नागपूरला होतं. पण गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे हे अधिवेशन मुंबईतच झालं होतं. त्यानंतर यावर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती तसेच विधान परिषदेची निवडणूक यामुळे यावर्षी देखील हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत भरवलं जाणार असल्याची चर्चा होती. अखेर ही चर्चा खरी ठरण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 22 ते 28 डिसेंबरला मुंबईत करण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे. सोमवारी (29 डिसेंबर) संसदीय कामकाज समितीची बैठक होणार आहे. त्यात या तारखांवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा : निर्णय झाला! राज्यात 'या' तारखेपासून सुरु होणार प्राथमिक शाळा
सह्याद्री अतिथीगृहावर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. मुख्यमंत्री हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. ते म्हणाले की, या आजारपणात आपण सर्वजण सहकार्य करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू आहे असेही ते म्हणाले. यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत कोविड परिस्थिती, लसीकरण, पीक पाणी परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपासंदर्भात राज्य शासनाने उचललेल्या पावलांची माहिती मंत्रीमंडळास दिली.
हेही वाचा : मुंबईची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार, 'या' उमेदवाराने घेतली माघार
कोविड परिस्थिती युरोपमध्ये बिकट होत असून आपण देखील महाराष्ट्रात पुरेशी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे, कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच चाचण्या वाढवाव्यात. कोविडचा धोका पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे आरोग्याचे नियम पाळण्यासाठी सर्वानी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत यावर चर्चा झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.