मुंबई, 27 जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरून वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारसह केंद्र सरकारवरही त्यांच्या मुलाखतीतून टीका केलीय. आता याच टीकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंना अल्झायमरचा आजार झाला असावा असं विधान केलंय. पंतप्रधान मोदींनी काय केलं हे विचारण्यापेक्षा २०१९ मध्ये केलेली भाषणं आठवा असा सल्लाही उद्धव ठाकरेंना दिला आहे. मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडणार नाही पण तुमच्या भ्रष्ट कारभारातून मुक्त करू असं म्हणत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. बावनकुळे यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे. कारण २०१९ च्या निवडणुकीत मोदीजींच्या कर्तृत्वावर तुम्ही शेकडो भाषणं केली आणि जिंकून आलात. जरा चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्या. म्हणजे मोदीजींवर केलेली भाषणं तुम्हाला आठवतील. Uddhav Thackeray : शरद पवारांबाबत अजितदादांच्या त्या वक्तव्यावर बोलले उद्धव ठाकरे, वाचा काय म्हणाले? महायुतीच्या जागा वाटपावरून केलेल्या टीकेवर बोलताना बावनकुळे यांनी म्हटलं की, याची चिंता तुम्ही करू नका, तुमची शिल्लक सेना तरी निवडणुकीपर्यंत तुमच्यासोबत राहते का? त्याकडे लक्ष द्या. आत्मनिर्भर भारतासाठी महायुती झाली आहे. तर तुमची महाविकास आघाडी सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी झाली. तुमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी ५ दावेदार बाशिंग बांधून बसले आहेत. त्यात तुम्हीही बोहल्यावर बसण्यासाठी उत्सुक आहात. पण २०२४ साली जनता तुम्हाला तुमच्या आवडीचं घरी बसण्याचं काम देणार आहे.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला होता. याला उत्तर देताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटलं की, ३० वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवून मुंबईची ज्यांनी लूट केली आणि मुंबईतील मराठी माणसाला विकासापासून दूर ठेवलं. ते उद्धव ठाकरे आज मुंबईची चिंता करत आहेत. मुंबईवरील तुमचं बेगडी प्रेम ऊतू जात आहे. मुंबई तोडणार असं सांगून तुम्ही मुंबईकरांची दिशाभूल करत आहात. मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडणार नाही पण येत्या निवडणुकीत तुमच्या भ्रष्ट कारभारातून मात्र मुंबई नक्की मुक्त होईल.