कोल्हापूर, 08 नोव्हेंबर : बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीत देखील अनेक ऐतिहासिक सिनेमे सध्या बनवण्यात येत आहेत. या सिनेमांमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला वेगळा इतिहास बघायला मिळतो. बऱ्याच वेळा अगदी तशीच घटना इतिहासात घडली असेल की नाही या बद्दलची शंका आपल्या मनात येते. अशाच प्रकारे सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड चालणार नाही, असा इशारा नुकताच संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिलेल्या हर हर महादेव चित्रपटामध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेबाबत आणि एकूणच ऐतिहासिक चित्रपटांबद्दल कोल्हापूर करांना काय वाटते हेच न्यूज 18 लोकमतने जाणून घेतले आहे. ऐतिहासिक चित्रपट हे आम्हाला बघायला आवडतात. त्यातून इतिहासाची ती घटना नक्कीच समजते. पण जसं घडलं आहे तसं चित्रपटात दाखवलं जात नाही. त्यामुळे जे सत्य आहे तेच आहे तसे दाखवले जावे, असं मत साक्षी कुलकर्णी या विद्यार्थीनीने व्यक्त केलं. ऐतिहासिक चित्रपट बघताना आपल्याला शाळेत जे शिकवले ते खरे की आपण बघतोय ते खरे असे प्रश्न आपल्याला पडतात. आपल्याला बघायला मिळणारा प्रत्येक चित्रपट सेन्सॉर बोर्डकडून पास झालेला असतो. पण ऐतिहासिक चित्रपटांसाठी सुद्धा वेगळे काही निकष असायला हवेत, असं मत महिला व्यापारी पूनम भावसार यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज विरुद्ध बाजीप्रभू देशपांडे हे महाराष्ट्र पचवेल? आव्हाड का असं म्हणाले?
सध्या कुठलाही ऐतिहासिक चित्रपट बनवताना त्यात भरपूर मिर्च मसाला लावून बनवला जात आहे. आपल्याला जसं पुस्तकात वाचायला मिळतं तसं चित्रपटात बघायला मिळत नाही. छत्रपती शिवराय हे आपल्याला देवाच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे फक्त पैसे कमविण्याचा उद्देश ठेवू नये. तर सरकारने देखील असे चित्रपट इतिहासकारांकडून तपासून घेऊनच प्रदर्शित करावेत, असं मत विद्यार्थी प्रज्वल चौगले याने व्यक्त केलं.
तर अजित मोरे यांनी संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की, ऐतिहासिक चित्रपटांबाबत पूर्ण माहिती गोळा करुन काढले पाहिजेत. चित्रपटात काही गोष्टी वाढवून किंवा वेगळे स्वरुप त्यातील गोष्टींना दिले तर ते शिवभक्त कधीच खपवून घेणार नाहीत.
संपूर्ण कोल्हापूर फिरलात तरी असे कबाब आणि चाट मिळणार नाही! पाहा Video
एकूणच कोल्हापूरकर हे ऐतिहासिक चित्रपटातील व्यक्तीरेखा, परिधान केलेली वस्त्रे, त्या काळातील नैसर्गिक परिस्तिथी, ती ऐतिहासिक घटना किंवा मोहीम अशा सर्व गोष्टी नीट बघत असतात. त्या चुकीच्या वाटल्यावर त्यांच्या भावना कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरुन दुखावल्या गेल्याचे बघायला मिळाले. त्याचबरोबर संभाजीराजे छत्रपतींच्या ऐतिहासिक चित्रपटांबद्दलच्या भूमिकेचे देखील नागरिकांकडून समर्थन केले जात आहे.