साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर 20 मे : सध्या भारतात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असताना महाराष्ट्र मात्र कडक उन्हामुळे सुकू लागला आहे. रणरणत्या उन्हामुळे नागरिक तर त्रस्त होत आहेतच. मात्र, शेतात पिकांचीही वाईट अवस्था होत आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात पुढच्या काही दिवसात आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. तर या काळात शेतकऱ्यांनी आपल्या शेतपिकाची योग्य काळजी घेण्यासाठी कोल्हापुरच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना काही सूचना करण्यात आलेल्या आहेत.
कसे असेल हवामान ?
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये दिनांक 20 ते 24 मे दरम्यान कमाल तापमान 38° ते 39°, तर सांगली जिल्ह्यात 40° ते 41° सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यातील किमान तापमान अनुक्रमे 23° ते 24° सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये अनुक्रमे वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 14 किमी पर्यंत, 15 ते 18 किमी आणि 13 ते 16 किमी दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
दरम्यान दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता जास्त राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी बाधवांनी दुपारच्या वेळी शेतामध्ये काम करणे टाळावे. भाजीपाला पिकाला आवश्यकतेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी. शेतकऱ्यांनी स्वतःची आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहनही शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
या पिकांची घ्या काळजी
ऊस - मे महिन्यामध्ये सरासरी बाष्पीभवनाचा वेग 6.24 मिमी प्रती दिवस एवढा असतो. त्यामुळे ऊस पिकास प्रती दिवस 5.33 लिटर एवढ्या पाण्याची गरज असते. त्यामुळे ऊस पिकाची पाण्याची गरज पूर्ण होण्यासाठी ठिबक सिंचन संच (4 लिटरचा ट्रीपर) दररोज 2 तास आणि 20 मिनिटे चालू ठेवावा.
टोमॅटो - सकाळच्या आणि दुपारच्या हवामानामध्ये वाढ झाल्याने टोमॅटो पिकावर फळ पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव आढळून आल्यास नोवाल्युरॉन 10 % ई.सी. 15 मिली किंवा क्लोरॅनट्रॅनिलीप्रोल 18.5 % एस.सी. 3 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मिरची - मागील आठवड्यामध्ये कोरडे हवामान राहिल्यामुळे मिरची पिकावर कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी फेनप्रोपीन 30%. सी. 5 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.
आंबा - आंबा पिकामध्ये तयार झालेली फळे नुतन झेल्याच्या सहाय्याने 80 ते 85 टक्के पक्वतेला काढावीत. काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.(नवीन आंबा लागवड - लागवडीचे अंतर भारी जमीन: 10x10 मीटर, मध्यम जमीन 9x9मीटर 1x1x1 मीटर आकाराचे खड्डे घेऊन हे खड्डे चांगले कुजलेले शेणखत पानशेत 40 ते 50 किलो + पोयटा माती + सिंगल सुपर फॉस्फेट 2 किलो या मिश्रणाने भरावेत. पण लागवड करावयाची असल्यास 5 x 5 मीटर अंतरावर करावी.)
नेहमीच्या पिकामध्ये चालवलं डोकं, शेतकरी झाला लखपती, Video
केळी - कमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने बागेमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी केळी पाने आणि अवशेष, जुना गव्हाचा भुसा, उसाचे पाचट, सोयाबीन भुसा यांचा वापर करून सेंद्रिय आच्छादन करावे.
नारळ - ऊन आणि कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या नारळ रोपांना शेड नेटच्या सहाय्याने सावली देण्याची आवस्था करावी.
जनावरे - जनावरे सावलीच्या ठिकाणी बांधावीत. शक्य असल्यास दिवसातून 4 से 5 वेळा त्यांच्या अंगावर पाणी फवारावे. जनावरांना पुरेसे शुद्ध आणि थंड पाणी पिण्यास द्यावे. दुपारच्या वेळी ऊन तसेच कमाल तापमान जास्त राहण्याची शक्यता असल्याने दुपारच्या वेळी जनावरे चारावयास नेऊ नयेत. जनावरांच्या गोठ्यातील हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. गोठ्यामध्ये तापमान नियंत्रणासाठी पंखे तसेच फॉगर्स उपलब्ध करावेत. म्हशींमध्ये धर्मग्रंथी कमी असल्यामुळे घामातून त्यांच्या शरीरात उष्णतेचे उत्सर्जन होत नाही त्यामुळे म्हशींना पाण्यात डुंबू द्यावे. गायीच्या अंगावर ओले कपडे किंवा गोणपाट भिजवून ते गाईच्या पाठीवर ठेवावे.
Mumbai News : आकाशातून पक्षी थेट रस्त्यावर कोसळले, मुंबईतील घटना, काळजी करणारं कारण समोर, Video
पोल्ट्री - कोंबड्यांचे उष्णतेपासून संरक्षणासाठी पोल्ट्री शेडच्या बाजूने बारदान लावावे आणि ते पाण्याने भिजवावे तसेच चतावर गवताचे किंवा बारदानाचे आछादन करावे त्यामुळे पोल्ट्री शेडचे तापमान कमी होण्यास मदत होते.
पूर्व मशागत - खरीप हंगामामध्ये पिक घेण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत (नांगरणी) करून घ्यावी. खरीप कडधान्य पिकण्यासाठी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर दोन पाळ्या द्याव्यात वाळवणी अगोदर हेक्टरी 5 टन कंपोस्ट/शेणखत शेतात मिसळावे.
(टीप : वरील सर्व माहिती ग्रामीण कृषि मौसम सेवा ऐएमएफयु कोल्हापूर, विभागीय कृषि संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आली आहे.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.