साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 28 फेब्रुवारी : आपलं जगणं सोपं करण्यात जगभरातील संशोधकांनी केलेल्या अफाट कामाचं मोठं योगदान आहे. त्यांच्या अंगी आजूबाजूच्या गोष्टींबद्दल जन्मत: कुतूहल असते. त्या कुतूहलातूनच त्यांचे ध्येय निश्चित होते. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी कोणत्याही अडचणींची ते पर्वा करत नाहीत. कोल्हापूरचे 75 वर्षांचे कॅन्सरग्रस्त आजोबा आजही नव्या संशोधनासाठी झटत आहेत. कॅन्सरसारखा गंभीर आजारही त्यांना त्यांच्या कामापासून रोखू शकलेला नाही. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त (28 फेब्रुवारी) या आजोबांच्या संशोधनाची माहिती घेऊ या. संशोधनासाठी सारं काही कोल्हापूरच्या सम्राट नगरमध्ये राहणारे अरविंद खांडके हे एक ऑटोमोबाईल संशोधक आहेत. ते पूर्वी घरगुती कापड व्यवसाय सांभाळत वेगवेगळे संशोधन करायचे. गाडीतील मण्यांपासून बनवलेलं सीट कव्हर, वाळवलेल्या माशांचे तेल या प्रकारच्या वेगवेगळ्या विषयात त्यांनी संशोधन केलं आहे. या संशोधनातूनच त्यांचा वाहनांचा अभ्यास वाढला. त्यांनी ऑटोमोबाईल या विषयात स्वत:ला झोकून दिलं. गेली 30 वर्ष ते या संदर्भात संशोधन करत आहेत. 2019 साली त्यांना या विषयावरील एका संशोधनात केंद्र सरकारचं पेटंट देखील मिळालंय. खांडके यांना 2016 साली कॅन्सर झाला. त्यांचं कॅन्सरचं ऑपरेशन झालंय. त्यानंतरही त्यांच्या शरिरातील कॅन्सर संपलेला नाही. कॅन्सरशी लढा देत, हिंमत न हारता त्यांचं नवं संशोधन सुरू आहे. यापूर्वी त्यांनी काही विषयांवर संशोधन केलंय. त्यांना या संशोधनाचा पुढचा टप्पा गाठायचा आहे. त्याचबरोबर पुढं जाऊन रॉकेट इंजिनसाठीही संशोधन करण्याची त्यांची इच्छा आहे,’ अशी माहिती खांडके यांचा मुलगा अभिजित यांनी दिली. दिवाळीत फटाक्यांच्या प्रदूषणापासून होणार सुटका! पाहा नवं संशोधन Video खांडके यांनी गाडीला पाण्याची टाकी जोडलेली यंत्रणा विकसित केलीय, त्यामध्ये इंजिन सुरू झाल्यावर त्यातील पाणी इंजिन जवळील एका छोट्या किटमध्ये येतं. ते पाणी तिथ ऑटोमाईज होतं. त्यानंतर तिथून ते पुढं इंजिनकडं पाठवलं जातं. पुढं पेट्रोल आणि पाणी यांचे एकत्रित ज्वलन होते. इंजिनकडं पाठवलेलं पाणी हे फक्त शिंपडल्याप्रमाणं बारीक थेंबाच्या रुपात पाठवलं जातं. त्यामुळे त्यातील पाण्याच्या थेंबाचं लगेच वाफेत रुपात होते. ही पेट्रोल आणि वाफ या दोन्हीची एकत्र शक्ती वाफेला मिळेते. या सगळ्या प्रक्रियेमुळे इंधनाची खूप बचत होते.
काय आहेत फायदे? 1) हे किट बसवल्यानंतर गाडीच्या सध्याच्या ॲव्हरेजमध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढ होते. २) या संशोधनामुळे जगभरात गाड्यांच्या धुरामुळे होणारे वायू प्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार आहे. ३) गाडीतून होणारे कार्बनचे उत्सर्जन कमी झाल्यानं इंजिन ऑइल लवकर खराब होत नाही. सध्या प्रति 2000 ते 3000 किलो मीटरनंतर इंजिन ऑइल बदलावे लागते. या किटमुळे 8000 किलो मीटरपर्यंत इंजिन ऑइल बदलण्याची गरज नाही. 4) हे किट बसवल्यानंतर इंजिनमध्ये घर्षण कमी होते. त्यामुळे इंजिनची झीज कमी होते. इंजिन दीर्घकाळ व्यवस्थित चालण्यास मदत होते. 5) या किटमुळे गाडीच्या इंजिन युनिट मध्ये होणारी कंपनेही कमी होतात. त्यामुळे शारीरिक त्रास कमी होऊन जास्त किलोमिटर गाडी चालवता येते. यापूर्वीचे संशोधन अरविंद खांडके यांनी याआधी देखील मोटरसायकलसाठी एक नॉन रिटर्न व्हॉल्व निर्माण केला होता. या शोधासाठी त्यांना 2005 साली NIF च्या ग्रासरूट्स इनोव्हेशन्स अँड ट्रॅडिशनल नॉलेजसाठीच्या तिसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते देण्यात आला होता. त्याच बरोबर त्यांना IIT मुंबईमध्येही पुरस्कारही मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या खर्चात होईल बचत! ‘या’ पद्धतीनं घरीच बनवा सेंद्रिय खत, Video या संशोधनात त्यांनी फोर-स्ट्रोक आणि टू-स्ट्रोक इंजिनमध्ये इंधन बचतीसाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी एक पार्ट बसवला होता. पेट्रोल इंजिनमधील एअर फिल्टर आणि कार्बोरेटरच्यामध्ये, तर डिझेल इंजिनमध्ये एअर फिल्टर आणि इनटेक मॅनिफोल्डच्या दरम्यान एक नॉन-रिटर्न व्हॉल्व्ह बसवता येतो. इंधन अर्धवट जळण्याची बाब कमी करण्यासाठी ही व्हॉल्वची यंत्रणा काम करते. ज्यामुळे इंधन कार्यक्षमता वाढून कमी प्रदूषण होते.
उतार वयातही संशोधक वृत्तीमुळे समाजोपयोगी संशोधनासाठी झटत असलेल्या अरविंद खांडके यांना आता त्यांच्या नव्या संशोधनाच्या यशाची आस लागलीय. शरीर साथ देत नसतानाही स्वतः ऐवजी दुसऱ्यांचा विचार मनी बाळगणाऱ्या करणाऱ्या या संशोधकाला सलाम.