कोल्हापूर, 21 ऑक्टोबर : कोल्हापूर जिल्ह्याला चित्रपट सृष्टीचा ठेवा असलेल्या जयप्रभा स्टुडिओ बचावासाठी कलाकारांनी आज (दि.21) आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. मागच्या 250 दिवसापासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र अश्वसनापलीकडे काहीच हाती लागले नसल्याने कलाकार संतप्त झाले आहेत. या आंदोलनानंतर तरी सरकारने दखल घ्यावी अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहन करू असा इशारा कलाकारांनी दिलाय. दरम्यान या आंदोलनाला कोल्हापूर जिल्ह्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पाठींबा दिला आहे. तर संभाजीराजेंनी सरकार खरमरीत पत्र लिहत तोडगा काढण्याचे आवाहन केलं आहे.
चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ असलेला जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याने त्याची विक्री रद्द करून तो चित्रीकरणासाठी खुला व्हावा या मागणीसाठी कलाकारांनी गेल्या अडीचशे दिवसापासून आंदोलन हाती घेतले आहे. भालजी पेंढारकर यांच्याकडून लता मंगेशकर यांनी हा स्टुडिओ घेतला होता. मात्र मागच्या वर्षी कोरोना काळात कोणाला कळू न देता जयप्रभा स्टुडिओची विक्री झाली होती. ही माहिती पुढे येताच कलाकारांनी संताप व्यक्त करत आंदोलन छेडले आहे.
हे ही वाचा : संभाजीराजे सरकारवर संतापले जयप्रभा स्टुडिओ संपवणाऱ्यांना पाठीशी घालू नका…
माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलांचा सहभाग असलेल्या कंपनीने हा स्टुडिओ खरेदी केला आहे. त्यांनीही सरकारने पर्यायी जागा दिल्यास स्टुडिओ परत देण्याच कबूल केले आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी केवळ आश्वासन दिल्याने कलाकारांनी आज टोकाचे पाऊल उचलले. तर यावर निर्णय न झाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहन करू असा इशारा दिलाय.
राज कपूर, दादा कोंडके यांच्यासह अनेकांनी या स्टुडिओत काम केले आहे. दादा कोंडके यांचे सिल्व्हर ज्युबिली ठरलेले सलग आठ चित्रपट ही या स्टुडिओत चित्रित झाले. मात्र कालांतराने इथलं शूटिंग थांबले आणि स्टुडिओला घरघर लागली, मालकी असलेल्या लता मंगेशकर यांनीही देखभाल जमत नसल्याचे कारण देत स्टुडिओची विक्री केली.
हे ही वाचा : तांदूळ, कुंकू आणि नोटा, वाड्यात सुरू होता भयंकर प्रकार, शाहूंच्या कोल्हापुरातली धक्कादायक घटना
खरतर हा स्टुडिओ छत्रपती राजाराम महाराज यांनी भालजी पेंढारकर याना दिला होता. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा आणि इथल्या वास्तू म्हणजे मंदिर मानत कलाकारांनी हे जपण्यासाठी आंदोलन हाती घेतले आहे.
आजच्या आंदोलनानंतर कलाकारांना अनेकांनी पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला तर छत्रपती संभाजीराजेंनी हा स्टुडिओ वाचवण्याची मागणी केली आहे.