मुंबई, 7 मार्च : फेब्रुवारी महिना हा मागील 100 वर्षांपेक्षा जास्त कालावधीतील सर्वात जास्त तापमान असलेला महिना ठरला होता. त्यातच मार्चमध्येही एकीकडे मोठ्या प्रमाणात तापमान जाणवत असताना हवामान खात्याने अवकाळीचा इशारा दिला होता. त्यानुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, बदलापूरसह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
छत्रपती संभाजीनगर सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी -
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वत्र सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची बॅटिंग सुरूच आहे. यामुळे रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका हे पीक जमीनदोस्त झाले असून, सोंगणीला आलेल्या या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास पुन्हा अस्मानी संकटाने हिसकावून घेतला आहे. जिल्ह्यामध्ये सर्व दूर काल सायंकाळ पासून काही ठिकाणी जोराचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
नागपुरातही शेती पिकाचे मोठे नुकसान -
नागपुरात सकाळी जोरदार वारा आणि ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस बरसला. धुळवडीच्या दिवशी झालेल्या पावसाने मात्र शेतकऱ्यांचे रंग उडाले. या पावसामुळे शेतात असलेल्या गहू, चना, संत्रा, आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच उकाड्यापासून त्रस्त शहरातील नागरिकांना पावसाने दिलासा, असे चित्रही पाहायला मिळाले.
शिक्षणासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडं लक्ष देणाऱ्या शिक्षिकेचा गौरव
ठाणे आणि बदलापूर परिसरातही रात्री पावसाने हजेरी लावली. तसेच जळगाव जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. रब्बी पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra rain updates, Mumbai rain, Rain, Rain updates, Weather, Weather Update