हैदर शेख / चंद्रपूर, 23 मार्च : महाराष्ट्रभर हळूहळू कोरोना व्हायरस (Coronavirus) पसरत आहे. त्यापार्श्वभूमीवर लोकांमधील संपर्क कमी करण्याची गरज आहे. यासाठी संशयितांना किंवा परदेशातून आलेल्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र नागरिकांकडून या नियमांचं वारंवार उल्लंघन केलं जात आहे.
यावर चंद्रपुरातील जिल्हा प्रशासनाने एक जालीम उपाय शोधून काढला आहे. कोरोनाचा (Covid - 19) लढा आता निर्णायक अवस्थेत पोहोचला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या तरी एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. मात्र सुमारे बाराशे लोकांना क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे.
संबंधित - तब्बल 29 कोरोना तपासणी किटची केली चोरी, पोलिसांनी चोराचा फोटो केला व्हायरल
चंद्रपुरातील सीमा आता पूर्णपणे बंद करण्यात येणार असून उद्यापासून जिल्ह्यात प्रवासी टॅक्सी सेवादेखील बंद केली जाणार आहे. 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन असल्याने मजुरांची रोजंदारी बुडण्याच्या दृष्टीने त्यांना 25 किलो धान्य देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी यासंबंधी आज एक बैठक घेत निर्देश दिले. प्रशासन व आरोग्य यंत्रणेने Home Quarantine चा शिक्का मारलेले अनेक व्यक्ती घरी न राहता समाजात मिसळत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे टाळण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने यावर जालीम उपाय शोधला आहे. असा शिक्का असलेल्या व्यक्तींच्या हातावर जीपीएस बेल्ट लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून उद्यापासून अशा पद्धतीने कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. Home Quarantine चा शिक्का असलेली व्यक्ती आता सरकारच्या सतत निगराणीखाली असणार आहे. यामुळे संशयित व्यक्ती समाजात मिसळणार नसल्याने संसर्ग साखळी आपोआप तुटेल अशी आशा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
संबंधित - Coronavirus पश्चिम महाराष्ट्रात पसरला, 8 नव्या रुग्णांसह संख्या 97 वरजीपीएस बेल्टचा कसा होईल उपयोग
क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देणाऱ्यांना हा बेल्ट कायम घालून राहावा लागणार आहे. याच्यामदतीने अधिकारी नागरिकांवर लक्ष ठेवतील. हे नागरिक घराबाहेर पडल्यास तशी माहिती जीपीएस बेल्टच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना मिळेल व त्यावर त्वरित कारवाई करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.