मुंबई, 17 जुलै : राजस्थानातील आमदारांना विकत घेऊन काँग्रेस सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून 500 कोटी रुपये जमवले आहेत, असा जोरदार आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. सरकार पाडायचे आमचे प्रयत्न नाही, असं भाजपकडून सांगण्यात येत आहे.
राजस्थानातल्या राजकारणाबाबत बोलताना सचिन सावंत म्हणाले, " केंद्रातील भाजपचे सरकार सत्ता पैसा आणि CBI, ED, इन्कम टॅक्स यांचा वापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते यासाठी वापरले जात आहेत. कर्नाटकातील काँग्रेस जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा वापर केला गेला आहे. कर्नाटकच्या आमदारांना भाजप सरकारच्या काळात मुंबईच्या हॉटेलात पोलिस बंदोबस्तात डांबून ठेवले होते. आताही महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून 500 कोटी रूपये जमा करून राजस्थान सरकार पाडण्यासाठी पाठविले आहेत अशी खात्रीशीर माहिती मला मिळाली असून यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे."
राजस्थान सरकारच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने केलेली कारवाई आणि मिळालेल्या ऑडिओ टेप्समध्ये भाजप कडून मोठ्या प्रमाणात घोडेबाजार केला जात आहे, याला दुजोरा मिळत आहे, असंही सावंत यांनी म्हटलं आहे. ऑडिओ टेप्सप्रकरणात भाजपचे संबित पात्रा यांनी या ऑडियो क्लिप्स काँग्रेसने बनवलेल्या आहेत. अंतर्गत मतभेद लपवण्यासाठीचा हा खटाटोप असल्याचं भाजपचं म्हणणं आहे.
लोकशाहीत असे अघोरी प्रकार करणाऱ्यांचे महाराष्ट्र भाजपातील मास्टमाईंड शोधले पाहिजेत अशी मागणी सावंत यांनी केली. सावंत यांच्या या आरोपांवर महाराष्ट्र भाजपकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.