मुंबई, 24 नोव्हेंबर : राज्यात कोरोना संकटामुळे (Corona Pandemic) अनेक स्था निक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महापालिका (Municipal Election), नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचाही समावेश होतो. या सर्व निवडणुका काँग्रेस (Congress) आता स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वत: याबाबतचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस स्थानिक पातळीवर कोणतीही तडजोड न करता या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार (Devanand Pawar) यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना याबाबत पत्र पाठवलं आहे. त्या पत्रात काँग्रेसची ही भूमिका नमूद करण्यात आली आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलंय?
“आगामी काळात राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती) निवडणुका होणार आहेत. येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकींच्या दृष्टीकोनाने या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुका काँग्रेस पक्षाने कुठलीही तडजोड न करता स्वबळावर लढविण्याच्यादृष्टीने आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन आढावा घ्यावा. तसेच यासंदर्भात नियोजन करुन आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांपुढे सादर करावा. तसेच आपल्या जिल्ह्यातील गठीत केलेल्या बुथ कमिट्यांची संपूर्ण तपशिलवार अद्यावत माहिती प्रदेशाध्यकांपुढे सादर करावी”, असे आदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. हेही वाचा : राज्यातील चार महापालिकांमध्ये पोटनिवडणुकीचा धुराळा, 21 डिसेंबरला मतदान, वाचा संपूर्ण कार्यक्रम
आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय?
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांपासून या तीनही पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सरकार सुरु आहे. सरकारचं काम चांगल्या प्रकारे सुरु आहे. पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीनही पक्ष एकत्र लढून भाजपचा सामना करतात का की स्वतंत्र लढून स्वत:ला सिद्ध करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने सर्वात आधी स्वतंत्र लढण्याची भूमिका जाहीर केली आहे. याशिवाय स्थानिक पातळीवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं काय भूमिका घेतात? याकडे राज्याचं लक्ष आहे.

)







