सागर कुलकर्णी, मुंबई, 20 जानेवारी : पाथरी येथे साईबाबा जन्मस्थळ विकास निधीवरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक होणार आहे. साईबाबा जन्मस्थळावरून निर्माण झालेल्या वादानंतर शिर्डीतील ग्रामस्थांनी बंदची हाक दिली होती. त्यानुसार एक दिवस बंदही झाला. पण काल रात्री उशीरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक करून सकारात्मक तोडगा निघाला नाही तर पुन्हा शिर्डी बंदची हाक देण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्र्यासोबत होणाऱ्या आजच्या बैठकीत शिर्डीचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार तसंच इतर लोकप्रतिनिधी नागरिक चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे आज बैठकीत कसा तोडगा काढतात याकडे शिर्डीतील नागरिकांसह महाराष्ट्रातील साईभक्तांचं लक्ष लागलं आहे. पाथरी येथे साईबाबा जन्मस्थळ विकसित करण्यासाठी देण्यात आलेल्या निधीचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी समर्थन केलं आहे. पण महसूलमंत्री आणि नगर जिल्ह्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी याबाबत स्पष्ट भूमिका अद्याप घेतली नाही. पाथरी विरुद्ध शिर्डीकर असा वाद साईबाबांचा पाथरी गावात जन्म झाल्याचा दावा पाथरीकर करत आहेत. तर साईबाबांनी कधीही स्वतःचा धर्म, जात सांगितली नाही, जन्मस्थळ सांगितले नाही. त्यामुळे साईभक्त आणि सरकारची दिशाभूल पाथरीचे लोक करत असल्याचा आरोप शिर्डीकरांनी केला. त्यामुळे पाथरी विरुद्ध शिर्डीकर असा वाद सुरू झाला आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणात भाजप खासदार नारायण राणेंच्या पत्नीला नोटीस शिर्डी आणि पाथरी यांच्या वादावर अनेक चर्चा पुढे येताना पाहायला मिळत आहेत. साईबाबा नेमके कोण होते? त्यांचं जन्मस्थळ कोणतं होतं याबद्दल दावे-प्रतिदावे केले जात आहेत. 1975 रोजी ब्रिटीशांना बाबा हे स्वातंत्र्य संग्रामाशी निगडीत असावेत, असे वाटले. त्यामुळे गुप्तहेर पाठवून त्यांची चौकशी करण्यात आली होती. असा काही लोकांनी दावा करण्यात आला आहे. तर हा दावा खोटा असून बाबांचा जन्म तामिळनाडूत श्रीवैकुंठम् इथे झाला असल्याचा प्रतिदावा करण्यात आला आहे. एका तामीळ चरित्रात साईबाबांचे वडील साठे शास्त्री तर आई लक्ष्मीबाई असल्याचा उल्लेख असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे बाबा हे गुजराती ब्राह्मण कुटुंबात नंदलाल व जमनाबाई यांच्या पोटी जन्मल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही अनेकदा बाबांच्या जन्मस्थळाबद्दल दावे झाले. 1918 साली बाबांनी समाधी घेतल्यांचं सांगितलं जातं त्यावेळी त्यांच्या भक्तांनी शिर्डीत विश्वस्त मंडळ स्थापन केलं. त्यावेळी पाथरी गावातील कुणाची समावेश नव्हता. त्यांच्या सोहळ्यालाही गावातील कोणीच आलं नव्हतं. शिर्डी हेच साईबाबांचे सर्वकाही असल्याचे जगभरातील साईभक्त मानतात. त्यामुळे या दाव्यांना अर्थ राहिलेला नाही, असे शिर्डीतील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. साईबाबांच्या जन्मस्थळाचा अधिकृत पुरावा नाही साईबाबांच्या जन्मस्थळाचा कोणताही अधिकृत पुरावा नसताना सरकार साईबाबांचं जन्मस्थळ म्हणुन पाथरीचा विकास करण्यावर शिर्डीकरांनी आक्षेप घेतला आहे. या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी शिर्डीकरांनी बंदचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला. साईबाबांनी आयुष्यभर फकिराच्या वेशात राहुन दिनदुबळ्यांची सेवा केली. मात्र आता साईभक्तांच्या भावनेला व साईबाबांच्या विचारधारेला नख लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना शिर्डीमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे शिर्डी आणि पाथरीतला वाद सामोपचारानं सोडवण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







