मुंबई, 27 एप्रिल : कामगार सेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. जोडे पुसणाऱ्यांच्या हातात सध्या राज्य आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं आहे. ‘काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात. जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे…. केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की’, असं एकनाथ शिंदे त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले.
काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष…
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 27, 2023
ठाकरेंचा बारसूवरून हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरुन सरकावर हल्लाबोल केलाय. आपले उद्योग इतर राज्यांनी पळवले तरी सरकार गप्प आहे. हे महाराष्ट्राचं काम ‘गार’ करणारं सरकार आहे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. पाठीत वार करून सरकार पाडलंय. सरकार पाडल्याचा बदला घेणारच असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मी बारसूबाबत पत्र दिलं होतं मात्र बारसूतील स्थानिकांवर जबरदस्ती केली नाही, असं स्पष्टीकरण ठाकरेंनी दिलंय. पर्यावरणाला हानी पोहोचवणारे प्रकल्प राज्यात नको. ही आमची भूमिका आहे, असंही ठाकरेंनी म्हटलं. राज्यात सुपाऱ्या घेऊन प्रकल्प लादले जात आहेत, असा हल्लाबोल ठाकरेंनी शिंदे- फडणवीसांवर केलाय.