मुंबई, 29 मार्च : मंत्रालयात सोमवारी एकाच दिवशी तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यापैकी मंगळवारी उपचारावेळी एका महिलेचा मृत्यू झाला तर दुसऱ्या महिलेची प्रकृती गंभीर आहे. मृत्यू झालेल्या महिलेने विष प्राशन करून मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आता महिलेच्या मृत्यूनंतर सरकारला जाग आली असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांसह प्रशासनाला आदेश दिले आहेत.
सामान्य नागरिकांना कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत भेटणार हे मंत्रालयातल्या दालनाबाहेर एका बोर्डवर लिहा असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्र्यांना दिले आहेत. याशिवाय विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस तशी वेळ राखून ठेवावी असेही म्हटले आहे.
मंत्रालयाच्या दारावर दुर्दैवी घटना, विष प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
सामान्य प्रशासन विभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याच विभागाकडून मंगळवारी सायंकाळी परिपत्रक जारी करण्यात आलंय. कामाचे स्वरुप लक्षात घेऊन मंत्र्यांनी अभ्यागतांना भेटी देण्यासाठी आठवडा, पंधरवडा, महिना यातले ठराविक दिवस आणि वेळ निश्चित करावी असे या परिपत्रकात म्हटले आहे. तसंच भेटण्याची वेळ आणि दिवस याची माहिती देणारा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा असेही आदेश दिले आहेत.
आत्महत्येच्या प्रयत्नानंतर मृत्यू झालेल्या महिलेचं नाव शीतल असं आहे. महिलेच्या पतीच्या नावावर धुळे एमआयडीसीत प्लॉट होता. तो एमआयडीसी अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा आरोप महिलेने केला होता. त्यासंदर्भात महिला मंत्रालयात आली होती. त्यावेळी विष घेतल्यानंतर पोलिसांनी महिलेला जेजे रुग्णालयात दाखल केल. पण उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde