औरंगाबाद, 31 जुलै: पावसात भाषण केल्यानं हमखास यश मिळतं, अशी कोपरखली भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मारली. आता मी देखील पावसात भाषण केलं. पुढच्या वेळेस हमखास यश मिळणार, असाही आशावादही रावसाहेब दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा... महाराष्ट्राकडेही देशाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
औरंगाबाद शहरात शुक्रवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण झालं. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा पुतळा उभा करण्यात आला आहे. कार्यक्रम सुरू असतानाच पावसाला सुरुवात झाली. हरिभाऊ बागडे यांच्यानंतर रावसाहेब दानवे भर पावसातच भाषणाला उभे राहिले. पावसात भाषण केल्याने हमखास यश मिळते, असा सणसणीत टोला रावराहेब दानवे यांनी शरद पवारांना लगावला. आता मी देखील पावसात भाषण केलं, पुढच्या वेळेस हमखास यश मिळणार असाही विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे.
सरकारचं स्टेअरिंग दोघांच्या हातात...
राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या गाडीचे स्टेअरिंग दोन जणांच्या ( शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस) हातात आहे. आणि तिसरा पार्टनर काँग्रेस मागे बसून सांभाळून चालवा रे आम्ही मागे बसलो आहोत, असं सांगत आहे. दोघांच्या हातात स्टेअरिंग असल्याने ही गाडी झाडावर आदळणार आहे. विशेष म्हणजे यांच्याकडे लायसन्स नाही की इन्शुरन्स सुद्धा नाही, अशा शब्दांत रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर विनोदी फटकारे मारले आहे.
दुसरीकडे, शरद पवार यांच्यावर रावसाहेव दानवे यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पलटवार केला आहे. पावसात भाषण कधी करायचं, हे रावसाहेब दानवेना अजून कळणार नाही, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरेंनी सरकारमधील सहकाऱ्यांची परवानगी घेऊनच अयोध्येला जावं..
दरम्यान, देशात धार्मिक आणि राजकिय क्षेत्रात मोठ्या चर्चेचा विषय असणारा राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. येत्या 5 ऑगस्टला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरांचं भूमिपूजन करणार आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या भूमिपूजन सोहळ्याला ठराविक लोकं उपस्थित राहणार आहेत. यावरून आता राजकारण चांगलंच रंगले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला जाणार की नाही? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यावरून, उद्धव ठाकरे हे अयोध्येला नक्की जातील, असा दावा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर यावरून भाजप नेते, अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
हेही वाचा.. 'बकरी ईद'वरून महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराजीचा सूर, काँग्रेस आमदार म्हणाले...
राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण आले नाही तरी, रामभक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का? हवे तर सरकारमधील सहकाऱ्यांची परवानगी घेऊन त्यांनी अयोध्येला जावं. प्रभू रामासाठी मानपान कसला. पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धव ठाकरे आता पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहेत. एवढेच नाही, तर उद्धव ठाकरे हे सर्व पातळ्यांवर नापास झाले आहेत. हे नापासांचेच सरकार आहे, अशीही टीका रावसाहेब दानवे यांनी याआधी केली होती.