मुंबई, 21 मे : कर्नाटक निकालावरून राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती, त्यानंतर दोन हजारांच्या नोटबंदीवरून देखील राज ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला होता. राज ठाकरे यांच्या या टीकेला आता भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांना आमचं निवेदन आहे की आपण उत्तम नेते आहात, अभ्यास करता पण सर्व विषयांवर तुम्ही बोललंच पाहिजे असं नाही, असं शेलार यांनी म्हटलं आहे. आता शेलार यांच्या या सल्ल्यावर मनसे त्यांना काय उत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकं काय म्हटलं शेलार यांनी? शेलार यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांना आमचं निवेदन आहे की तुम्ही उत्तम नेते आहात, अभ्यास करता पण सर्व विषयावर बोललं पाहिजे असं नाही. तुम्ही व्यक्तिगत माझ्यावर बोलाल तर ठीक आहे. पण तुम्ही आमच्या सर्वोच्च नेत्यांवर बोलाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाहीत. आम्ही धरसोड करणारे नाहीत, मोदीजी जे करता ते प्रामाणिकपणे करता, असा टोला शेलार यांनी राज ठाकरे यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. ते मुंबई भाजपच्या कार्यकारीनी बैठकीनंतर बोलत होते. मुंबईतील मतदारांनी उद्धवजींचं नेतृत्व अनेकवेळा नाकारलं आहे. आम्ही तुम्हाला हिंदुत्वामुळे पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेत अनेकवेळा शिवसेनेची घसरण झाली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबई महापालिकेत पन्नासचा आकडाही पूर्ण करणार नाही, असं शेलार यांनी म्हटलं आहे.