मुंबई, 25 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून दिल्या शुभेच्छा दिल्या आहेत. निवडणुकीत शिवसेनेचे जे उमेदवार निवडुन आले त्याबद्दल अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला शिवसेनेची मदत घ्यावी लागणार असल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे दिवाळीनंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांची नव्या सरकार स्थापनेपूर्वी बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेला नव्या सरकारमध्ये किती वाटा मिळणार, याबाबतची चर्चा होण्याचीही शक्यता आहे. महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाला बहुमतासाठीच्या जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आता भाजप - शिवसेनेच्या वाटाघाटींमध्ये नेमकं काय ठरतंय याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. सत्तास्थापनेसाठीच्या वाटाघाटींमध्ये भाजप - शिवसेनेत कायकाय राजकीय नाट्य घडतं हेही पाहावं लागेल. उद्धव ठाकरे त्यांच्या 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनीही 15 बंडखोर आपल्या संपर्कात असल्याचं भाष्य केलं आहे. आकड्यांच्या या खेळात सत्तास्थापनेच्या 3 शक्यता आहेत. 1. भाजप आणि शिवसेनेने युतीधर्म पाळून एकत्र सत्ता स्थापन करणं भाजप आणि शिवसेनेने निवडणुकीआधीच युती केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतत ‘आमचं ठरलंय’ असं सांगून यशस्वी वाटाघाटींची हमी देत होते. उद्धव ठाकरे म्हणतात तसं ठरल्याप्रमाणे झालं तर राज्यात महायुतीची सत्ता येईल. त्यातही अडीच-अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाचं काय, सेनेसमोर उपमुख्यमंत्रिपदाचा पर्याय ठेवला जाईल का? शिवसेनेला सत्तेत समान वाटा मिळेल का हे प्रश्न आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपला 122 जागा होत्या तर शिवसेनेकडे 63 जागा होत्या. यावेळी मात्र भाजपला 100 हून थोड्याच जास्त जागा मिळाल्या आहेत. त्या तुलनेत शिवसेनेचं नुकसान झालेलं नाही. त्यामुळे शिवसेनेचा वाटाघाटींमध्ये वरचष्मा असू शकतो. 2. शिवसेनेची काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीशी सलगी सत्तास्थापनेचा दुसरा पर्याय आहे शिवसेना आणि काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने एकत्र येण्याचा. राष्ट्रवादीला यावेळी 54 जागा मिळाल्या तर काँग्रेसकडे 45 जागा आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी चांगली झालीय. त्यामुळे हे 3 पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात. हा पर्याय काँग्रेससाठी फायद्याचा आहे. 3. भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तास्थापनेच्या वाटाघाटींमध्ये शिवसेनेने खूपच मागण्या केल्या तर भाजपपुढे राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवण्याचाही पर्याय आहे. शरद पवारांनी आतापर्यंत अनेक आघाड्या जमवल्या आहेत, सरकारस्थापनेचा त्यांचा अनुभवही दांडगा आहे. अशा स्थितीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचा पर्यायही नाकारता येणार नाही, असं एका भाजप नेत्याने सांगितलं. VIDEO : ‘कन्येचा पराभव शिवसेनेला राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यामुळे’, खडसेंचा आरोप
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.