भडारा, 10 ऑगस्ट : प्रशिक्षणासाठी जात असल्याचे घरी सांगून निघून गेलेल्या एका 19 वर्षीय तरुणीने वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा शहरानजीक उघडकीस आली आहे. (Bhandara suicide case) अर्पिता धनराज गजभिये (19 वर्ष) रा. खराडी ता. भंडारा असे मृत तरुणीचे नाव आहे. ती भंडारा येथील लाईफलाईन लॅबमध्ये दररोज प्रशिक्षणासाठी येत होती. नेहमीप्रमाणे प्रशिक्षणासाठी जात असल्याचे सांगून निघून गेली. मात्र सायंकाळच्या सुमारास तिचा मृतदेह वैनगंगा नदीच्या लहान पुलाजवळ तरंगताना आढळून आला.
याप्रकरणी भंडारा शहर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्यामागे आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. तिच्या या दुर्देवी मृत्युने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : Kerala : कसला हा योगायोग 24 वर्षीय मुलगा आणि 42 वर्षीय आई दोघेही एकाचवेळी स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण
मागच्या 15 दिवसांपूर्वीही धक्कादायक घटना घडली होती
एका मुलीला वाढदिवस साजरा करण्यासाठी वडिलांनी पैसे दिले नाहीत, म्हणून या मुलीने अत्यंत टोकाचे पाऊल उचलत धक्कादायक निर्णय घेतला. तिने स्वयंपाक खोलीतील लोखंडी हुकाला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
वाढदिवस साजरा करण्यासाठी वडिलांनी पैसे दिले नाहीत, म्हणून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील इंदिरानगरात शुक्रवारी उघडकीस आली. मृत विद्यार्थिनी लाखनीच्या समर्थ महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाला शिकत होती. मारिया ऊर्फ खुशी अहमद सैय्यद (19, रा. इंदिरानगर, सिपेवाडा रोड, लाखनी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
मारिया ही वडील, आई व लहान भावासोबत घरी गुरुवारी 21 जुलैला जेवायला बसली होती. यावेळी तिने माझा शुक्रवारी वाढदिवस आहे, मला पैसे हवे आहेत, असे आपल्या पालकांना सांगितले. त्यावर वडिलांनी सकाळी कामावर जातो व सायंकाळी केक आणतो, असे सांगितले. त्यानंतर रात्री सर्वजण झोपून गेले. यानंतर शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मारियाचे वडील कामाला निघून गेले.
हे ही वाचा : मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातीही ठरली! फडणवीसांकडे दोन ‘जम्बो’ मंत्रिपदं?
तर लहान भाऊ कवनेल सैय्यद (17) हा नळ फिटिंगच्या कामासाठी नागपूरला चालला गेला. यानंतर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आई तबसुम अहमद सैय्यदही गोंडमोहल्ला येथील मदरशात शिकवायला निघून गेली. याचदरम्यान मारिया घरी एकटीच होती. तसेच रात्रीचा वडिलांनी वाढदिवसाला पैसे दिले नाही म्हणून अजूनही तिच्या डोक्यात राग होता. याच रागातून मारियाने खोलीतील लोखंडी हुकाला ओढणी बांधून गळफास लावत आत्महत्या केली.
दरम्यान, दुपारच्या सुमारास स्थानिकांच्या लक्षात ही घटना येताच मारियाला लगेचच ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, यावेळी डॉ. मिलिंद भुते यांनी मारियाला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक गौरीशंकर कडव करीत आहेत.