औरंगाबाद, 17 फेब्रुवारी : अगोदर रॉडने व नंतर दगडाने ठेचून पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. सोमवारी पहाटे घडलेली ही घटना मंगळवारी रात्री उशिरा उघडकीस आली. कविता सिद्धेश त्रिवेदी असं 32 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे.
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केली. मात्र आईच्या हत्येची कोणतीच कल्पना नसलेली तिची 2 लहान लेकरं तिच्या मृतदेहाच्या आसपासच अनेक तास खेळत होती. औरंगाबाद शहरातील पिसादेवी भागातील या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पत्नीच्या हत्येनंतर मृतदेह आणि दोन्ही मुलांना सोडून निर्दयी पती पसार झाला. सिद्धेश गंगासागर त्रिवेदी असं फरार पतीचं नाव आहे.
हेही वाचा - गुंड गजानन मारणेच्या मिरवणुकीचे चक्क ड्रोन कॅमेऱ्याने शुटिंग, पोलीसही झाले हैराण
पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून वाद झाला. मात्र नंतर या वादाने टोक गाठलं आणि यातच सिद्धेश याने आपल्या पत्नीवर रॉडने वार करण्यास सुरुवात केली. भांडणातील राग सिद्धेशच्या इतक्या डोक्यात गेला होता की नंतर त्याने दगडाने ठेचत पत्नी कविता हिचा जीव घेतला. हे सगळं घडत असताना त्यांची दोन लहान मुलंही तिथंच होती. मात्र आपला जन्मदाता बापच आईच्या जीवावर उठला आहे, हे कळण्याइतकं त्यांचं वय नव्हतं. आईची हत्या करून बाप तिथून पळून गेला आणि नंतरही मुलं आईच्या मृतदेहाशेजारीच खेळत राहिली, असं दुर्दैवी चित्र या घटनेनंतर पाहायला मिळालं.
दरम्यान, या प्रकरणाबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आता फरार पतीचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.