मुंबई : बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला होता. तर 3 गंभीर आणि 20 जखमी असे एकूण 23 भाविक जखमी झाले होते. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येक चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. शासकीय खर्चाने सर्व जखमींवर व्यवस्थित उपचार करण्यात यावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत. याबाबत जनसंपर्क अधिकारी मुख्यमंत्री सचिवालयाकडून माहिती देण्यात आली आहे. नेमकं काय घडलं? अकोल्यातील बाळापूर पारस आणि शेळद फाटा पारस भागात पावसानं थैमान घातलं होतं. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात मोठं नुकसान झालं. त्याच दरम्यान बाबुजी महाराज संस्थानाच्या मंदिरात भाविक जमले असताना छतावर निंबाचं झाड कोसळलं. या दुर्घटने २३ भाविक जखमी झाले तर 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय अधिकारी, बाळापूर पोलीस, तहसीलदार, पारस औष्णिक विद्युत केंद्रातील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी बचावकार्य सुरू केलं. पाऊस आणि त्यामध्ये अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. रुग्णवाहिका वेळेत पोहोचण्यात अडचणी होत्या. निंबाचं झाड पडून झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती दुर्घटनेनंतर लगेच मिळाली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.