मुंबई, 5 डिसेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाविकासआघाडी आक्रमक झाली आहे. महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात 17 डिसेंबरला मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान महाविकासआघाडीचा विराट मोर्चा निघणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल, राज्य सरकार, भाजप आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं.
अजितदादांचा इशारा
महाविकासआघाडीच्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राज्यपाल आणि सरकारला इशारा दिला. 'महाविकासआघाडीच्या मोर्चात अबू आझमी, समाजवादी पक्ष, शेकाप सहभागी होणार आहे. 8 डिसेंबरला पुन्हा मोर्चा नियोजनाची बैठक होईल,' अशी माहिती अजित पवारांनी दिली.
'शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. राज्यपाल हटाव ही भूमिका आहे. 17 तारखेच्या आत राज्यपालांना हटवलं तरी मोर्चा निघणार,' अशी आक्रमक भूमिका अजित पवार यांनी घेतली.
'देगलूर, अक्कलकोट, सांगलीमधली गावं कर्नाटकात जाण्याबाबत बोलायला लागली. काही गावं गुजरातमध्ये जायची मागणी करत आहेत. याआधी महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी या गावांसोबत संवाद ठेवला होता. हे या सरकारचं अपयश आणि दुर्लक्ष आहे. कर्नाटकात आम्ही सध्या जात नाही म्हणणारे मंत्री पळपुटे आहेत. शिंदे-फडणवीस सरकार लंगडं समर्थन करत आहे,' अशी टीका अजित पवारांनी केली.
'शिवाजी महाराजांचा अपमानाने राज्यातील जनतेच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. सांगलीच्या गावांना पाणी मिळत नाही, त्याला आम्ही जबाबदार हा आरोप धादांत खोटा आहे. आमच्या योजनांना या सरकारने स्थगिती दिली आहे. बेळगावमध्ये 2 मंत्री जाणार हे ठरलं होतं, मग ते का गेले नाहीत?', असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.
महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात महाविकासआघाडीचा विराट मोर्चा, उद्धव ठाकरे आक्रमक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.