रत्नागिरी, 21 जून : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनाऱ्यावर मोठे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचा तडाखा इतका भीषण होता की, एक भलेमोठे मालवाहू जहाज मिऱ्या बंधाऱ्याजवळ येऊन धडकले आहे. या जहाजातून आता डिझेल गळतीची भीती निर्माण झाली आहे. 3 जूनला निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर आदळले होते. 100 ते 120 किमी प्रतितास वेगाने समुद्रात वारे वाहत होते. त्यामुळे या वादळात एक भलेमोठे मालवाहतूक करणारे जहाज भरकटले आणि समुद्रकिनाऱ्याला लागले. रत्नागिरी जिल्ह्यातील मिऱ्या बंधाऱ्याजवळ समुद्रात भरकटलेले हे जहाज येऊन आदळले. तेव्हापासून हे जहाज अजून समुद्रात जाऊ शकले नाही. समुद्र अजूनही खवळलेला आहे. या जहाजाला लाटांचे प्रचंड तडाखे बसत आहेत. प्रचंड वेगात समुद्राच्या लाटा या जहाजावर आदळत आहेत.
या जहाजात सध्या 25 हजार लिटर डिझेल भरलेलं आहे. लाटांच्या तडाख्यात जर जहाजाला गळती लागली तर हे डिझेल समुद्रात मिसळून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होण्याचा धोका आहे. हे लक्षात घेउन जहाजातील डिझेल दोन दिवसांत उतरवून घ्या, अशी नोटीस बंदर विभागाने जहाज कंपनीला बजावली आहे. धक्कादायक! वधू-वराची कार नदीत गेली वाहून, संसार थाटण्याआधीच… या जहाजातील सर्व कर्मचाऱ्यांना स्थानिकांच्या मदतीने सुखरुपपणे जहाजातून खाली उतरवण्यात आले आहे. हे मालवाहू जहाज सिमेंट घेऊन जात होते. पण, निसर्ग चक्रीवादळामुळे समुद्रात याचा निभावा लागला नाही. भलेमोठे जहाज पाहण्यासाठी किनाऱ्यावर गावकऱ्यांची गर्दी पाहण्यास मिळत आहे. संपादन - सचिन साळवे

)







