जयपूर, 30 डिसेंबर : भारतात शतकानुशतकं पती (Husband) आणि पत्नीचं (Wife) नातं सात जन्माचं असतं असं मानलं गेलं आहे. पती-पत्नीच्या हजारो प्रेमकथा (Love Stories) आजही समाजात दिसून येतात. पती आणि पत्नीमधील निस्सीम प्रेम नेमकं कसं असतं, हे राजस्थानमधील (Rajasthan) अजमेर (Ajmer) येथील रहिवासी विजेंद्रसिंग राठोड (Vijender singh Rathore) यांच्याकडून जाणून घेता येईल. केदारनाथ (Kedarnath) येथील दुर्घटनेचा अनुभव घेतलेल्या विजेंद्रसिंग राठोड यांनी पती आणि पत्नीच्या प्रेमाचा एक आदर्श घालून दिला आहे, जो तुम्हाला क्वचितच पाहायला मिळेल. केदारनाथ दुर्घटनेचे साक्षीदार विजेंद्रसिंग यांची पत्नी लीला (Leela) या पुरात (Flood) वाहून गेलेली असल्याची शक्यता होती. पण त्यांनी आशा सोडली नाही. विजेंद्र सुमारे 19 महिने पत्नीचं छायाचित्र घेऊन गावोगावी फिरत होते. सुमारे 1000 हजार गावं फिरल्यानंतर अखेरीस त्यांना त्यांची लीला मिळाली. पती-पत्नीच्या प्रेमाच्या या सत्यकथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ रॉय कपूर लवकरच करणार आहेत.
अजमेर येथील विजेंद्र हे एका ट्रॅव्हल एजन्सीत नोकरी करत होते. 2013 मध्ये लीला यांनी पती विजेंद्र यांच्याकडे चारधाम यात्रा करण्याची इच्छा व्यक्त केली. याच दरम्यान ट्रॅव्हल एजन्सीची (Travel Agency) एक टूर केदारनाथला जाणार होती. विजेंद्रसिंह हे पत्नी लीलाला घेऊन केदारनाथला गेले. केदारनाथमधील एका लॉजमध्ये त्यांनी मुक्काम केला. लीला यांना लॉजवर सोडून काही कामानिमित्त विजेंद्र बाहेर पडले. याच दरम्यान एक खळबळजनक घटना घडली. उत्तराखंडमधील पूरस्थिती (Flood Situation) भीषण झाली. पुराचं पाणी केदारनाथपर्यंत पोहोचलं.
दृश्य पाहून त्याचं मन हेलावलं
विजेंद्र सिंह यांनी मोठ्या मुश्किलीनं त्यातून सुटका करून घेतली. पाण्याचा वेग कमी झाल्यानंतर विजेंद्र यांनी पत्नी लीलाला ज्या लॉजमध्ये सोडलं होतं, तिथे धाव घेतली. पण तेथील दृश्य पाहून त्याचं मन हेलावून गेलं. सर्व काही पाण्यामध्ये वाहून गेलं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे (Disaster) प्रत्येक व्यक्ती असहाय झाल्याचं चित्र होतं. ते दृश्य पाहून विजेंद्र याचं मन हेलावलं आणि क्षणभर मनात विचार आला की लीलाही पुरात वाहून गेली का? परंतु, त्यावेळी विजेंद्र यांनी मनाची समजूत काढत, असं होणं शक्य नाही, असा दिलासा दिला.
हेही वाचा : झोपलेल्या पतीसोबत शारीरिक संबंध; दुसऱ्या दिवशीच महिलेला भोगावा लागला असा परिणाम
प्रत्येक व्यक्तीकडून नकारात्मक उत्तर मिळूनही विश्वास कायम राहिला
इतक्या वर्षांची साथ अशी एका मिनिटात सुटू शकत नाही, असा विश्वास विजेंद्र यांना मनोमन वाटत होतं. पण त्या भयावह परिस्थितीत कोणीही जिवीत असल्याचं दिसत नव्हतं. चोहीकडे मृतदेहांचा खच पडला होता. कोणाचा मुलगा, कोणाचा भाऊ, कोणाचा पती तर कोणाची पत्नी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. विजेंद्र यांनी त्यांच्या पाकिटात पत्नी लीलाचा फोटो ठेवला होता. ही बाब लक्षात येताच विजेंद्र यांनी तो फोटो (Photo) पाकिटातून काढत पत्नीचा शोध सुरू केला. यांना कुणी पाहिले आहे का? असा प्रश्न विचारत विजेंद्र यांनी भ्रमंती सुरु केली. परंतु, उत्तर मात्र नकारात्मकच मिळत राहिले. तरीही वास्तव परिस्थिती स्वीकारण्यास विजेंद्र तयार नव्हते.
लीला पुराच्या पाण्यात वाहून गेल्या असं सर्वांचं मत होतं
यादरम्यान मदतकार्य सुरु झालं होतं. दोन आठवड्यानंतर विजेंद्र यांची लष्करी अधिकाऱ्यांशी भेट झाली. यावेळी विजेंद्र यांनी घडलेली घटना या अधिकाऱ्यांना सांगितली. लीला या वाहून गेल्या आहेत, असं जवळपास सर्वांचं मत होतं. परंतु, विजेंद्र यांचा यास नकार होता. त्यानंतर विजेंद्र सिंह यांनी घरी फोन करत मुलांना दुर्घटनेची माहिती दिली. यावेळी त्यांचे कुटुंबीयही घाबरले आणि आई देखील? मुलीनं असा भीतीयुक्त प्रश्न विजेंद्र सिंह यांना विचारताच ती जिवंत आहे असं सांगत त्यांनी मुलीला खडसावले.
हेही वाचा : खालिस्तानी संघटनांचा मुंबईत घातपात घडवण्याचा मोठा कट, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
सरकारनेदेखील लीला यांनी मृत घोषित केले
दुर्घटनेनंतर तब्बल महिनाभर विजेंद्र हातात पत्नीचं छायाचित्र घेऊन गावोगाव भटकंती करत राहिले. याचदरम्यान त्यांच्या घरी शासकीय कार्यालयातून फोन आला. लीला यांना मृत घोषित करण्यात आलं असून, दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना नुकसानभरपाई (Compensation) देण्यात येत आहे. ही रक्कम तुम्ही कार्यालयातून घेऊन जावी, असं फोन करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं. परंतु, नुकसानभरपाई घेण्यास विजेंद्र यांनी नकार दिला. कुटुंबीयांनी समजूत काढूनही विजेंद्र नकारावर ठाम राहिले.
27 जानेवारी 2015 रोजी विश्वास आला दृष्टीक्षेपात
विजेंद्र यांनी आपली जिद्द सोडली नाही आणि पत्नीच्या शोधार्थ ते पुन्हा उत्तराखंड (Uttarakhand) येथे गेले. उत्तराखंडमधील शहरं, गावं फिरत असताना 19 महिने उलटून गेले होते. या दरम्यान सुमारे 1000 गावांमधून विजेंद्र यांनी पत्नीच्या शोधार्थ भटकंती केली. त्यानंतर विजेंद्र यांचा विश्वास दृष्टीक्षेपात येताना दिसू लागला. 27 जानेवारी 2015 रोजी विजेंद्र सिंह यांनी उत्तराखंडमधील गंगोली गावात राहणाऱ्या एका व्यक्तीला लीला यांचा फोटो दाखवला असता त्याने सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्या व्यक्तीनं सांगितलं की ही महिला आमच्या गावात फिरताना मी पाहिली आहे. तत्क्षणी विजेंद्र त्या व्यक्तीसोबत गंगोली येथे पोहोचले. तिथे रस्त्याच्या कडेला एका चौकात एक महिला बसलेली दिसली. विजेंद्र यांनी पाहताच ती महिला लीला असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
आईला पाहताच मुलांना रडू कोसळलं
लीला यांना पाहताच विजेंद्र यांनी त्यांचा हात पकडला आणि लहान मुलासारखं रडू लागले. पत्नीच्या शोधात असलेल्या विजेंद्र यांचे डोळे तिला पाहण्यासाठी आसुसले होते. लीला भेटताच त्यांना त्यांच्या भावना आवरता आल्या नाहीत. लीला यांची मानसिक स्थिती बरी नव्हती. त्या विजेंद्र यांना ओळखू शकल्या नाहीत. त्यानंतर विजेंद्र लीलाला घेऊन घरी परतले. 12 जून 2013 पासून दूर असलेल्या आईला पाहताच मुलांनाही रडू कोसळलं.
जीवनातील सर्वात कठीण काळ
लीला यांच्या शोधार्थ घालवलेले हे 19 महिने विजेंद्र सिंह राठोड यांच्या जीवनातील सर्वात कठीण टप्पा होता. मात्र अशा कठीण प्रसंगीदेखील त्यांनी प्रेमाचा धागा मोठ्या धाडसानं बांधून ठेवला. विजेंद्र यांच्या पत्नीवरील अतूट प्रेम आणि विश्वासापुढे निसर्गालाही हार मानावी लागली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.