मुंबई, 28 एप्रिल: कोरोनाव्हायरसच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग शोधले जात आहेत. नवनवे उपायांबाबत संशोधन केलं जात आहे. त्यातच एका दिलासादायक संशोधनाचं वृत्त पुढे आलं आहे. साधं सर्दी-पडसं (Common Cold) होण्यास कारणीभूत असलेला रायनोव्हारयस (Rhinovirus) शरीरात शिरला, तर तो कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) खात्मा करू शकतो, असा दावा या संशोदनात केला आहे. अद्याप हे संशोधन पूर्ण झालेलं नाही. पण खरंच असं झालं, तर जगासाठी ती एक गूड न्यूज ठरेल.
माणूस असो, पशू असोत किंवा विषाणू असोत, सगळ्यांनाच स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असतं, वाढवायचं असतं. त्यासाठी एकमेकांमध्ये लढाई करायलाही ते मागे-पुढे पाहत नाहीत. लढाईत जे जिंकतात, ते आपलं अस्तित्व टिकवतात आणि स्वतःला सिद्ध करतात. याचप्रमाणे विषाणूही एखाद्या प्राण्याच्या शरीरात शिरण्यासाठी, त्यावर ताबा मिळवण्यासाठी एकमेकांच्यात लढतात. जो जिंकतो तो दुसऱ्याला नष्ट करतो. हेच तत्त्व रायनोव्हायरसच्या बाबतीतही पाहायला मिळतं. नेहमीच्या सर्दी-पडशासाठी कारणीभूत असलेला हा विषाणू शरीरात शिरला, तर कोरोना विषाणूचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. जर्नल ऑफ इन्फेक्शियस डिसीज (Journal of Infectious Disease) या विज्ञानपत्रिकेत या संशोधनाबाबतचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
हे वाचा - आता घरातही MASK वापरा; कोरोनापासून बचावासाठी मोदी सरकारची नवी सूचना
रायनोव्हायरसला RV असंही म्हणतात. सर्दी-पडसं होण्याचं ते एक प्रमुख कारण आहे. या विषाणूचा संसर्ग झाला तर शरीरातल्या वरच्या श्वसनयंत्रणेवर परिणाम होतो. थंडी आणि वसंत ऋतूत रायनोव्हायरसचा प्रकोप होतो. मात्र तो वर्षभरात केव्हाही होऊ शकतो. रायनोव्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर सर्दी, नाक गळणं, थोडा ताप अशी लक्षणं दिसतात आणि आठवड्याभरात बरीही होतात. 25टक्के रुग्णांमध्ये सर्दी दोन आठवड्यांपर्यंतही राहू शकते. यावर कोणतंही अँटीव्हायरल औषध नाही आणि त्याची गरजही पडत नाही. माणसाची प्रतिकारशक्तीच त्याला यातून बरं करते. लक्षणांमधून आराम पडावा म्हणून काही औषधं दिली जातात.
ग्लासगोमधल्या 'सेंटर फॉर व्हायरल रिसर्च'मध्ये हे संशोधन झालं. या प्रयोगादरम्यान माणसाच्या श्वसनतंत्रावर काम करणाऱ्या काही पेशींचा संच वापरण्यात आला. त्यावर रायनोव्हायरस आणि कोरोनाव्हायरस हे दोन्ही विषाणू एकाच वेळी सोडण्यात आले. निरीक्षण केल्यावर असं लक्षात आलं, की त्यावर रायनोव्हायरसने कब्जा केला होता आणि कोरोनाव्हायरसचा त्यावर फारसा प्रभाव पडला नाही.
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर पहिल्या 24 तासांत रायनोव्हायरसने शरीरात प्रवेश केला, तर कोविड (Covid) होण्याचा धोका जवळपास नाहीच, असं आढळलं. रायनोव्हायरस कोरोनाव्हायरसचा खात्मा करतो. म्हणजेच सर्दी-पडशाचा विषाणू शरीरात आला, तर कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो, असा याचा अर्थ.
हे वाचा - कोरोना लस घेण्याआधी हा VIDEO जरूर पाहा; नाहीतर लसीकरणही पडेल महागात
अशा प्रकारचा प्रयोग याआधीही करण्यात आला होता. 2009 मध्ये युरोपीय देशांमध्ये स्वाइन फ्लूने थैमान घातलं होतं, तेव्हा रायनोव्हायरसचा हंगाम होता. त्या वेळी ज्यांना सर्दी-पडसं झालं, त्यांना स्वाइन फ्लू झाला नव्हता, असं निरीक्षण नोंदवलं गेलं. त्यावरूनही असा निष्कर्ष काढण्यात आला होता, की रायनोव्हायरस नसलेल्या शरीरातच अन्य विषाणूचा संसर्ग झाला होता.
अर्थात, यात दुसरा धोका आहेच. सर्दी-पडसं बरं झालं की, त्यानंतर मात्र कोरोनाव्हायरस त्या शरीरात हल्ला करू शकतो. कारण तेव्हा शरीराची प्रतिकारयंत्रणा शांत असेल. काही वेळा कोरोना आणि सर्दीचे विषाणू एकाच वेळी शरीरात असतील, तर कोरोनाला सर्दी समजून लोकांकडून दुर्लक्षही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असा प्रयोग सध्या व्यापक पातळीवर करता येणार नाही, असं शास्त्रज्ञ म्हणत आहेत. कारण अद्याप या निष्कर्षाला ठोस पुष्टी मिळालेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Covid-19, Lifestyle, Wellness