चीन,30 जानेवारी: चीनच्या सीमेवर तणावपूर्ण स्थिती आहे. राजकारणाच्या बाबतीत कमी पडल्यावर भारताला हरवण्यासाठी चीन वेगळ्या काही गोष्टी करू शकतो, असं वृत्त आहे. भारताविरोधात चीन वापरू शकतो, असं एक तंत्र आहे क्लाउड सीडिंगचं. (Cloud Seeding) त्याद्वारे चीन त्यांच्या देशात कृत्रिम पाऊस पाडू शकतो आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अशी स्थिती तयार करू शकतो, की भारतात अनेक ठिकाणी दुष्काळ पडेल.
चीनने सगळ्यात आधी 2008मध्ये वेदर मॉडिफिकेशन सिस्टिमचा (Weather Modification System) वापर केला होता. तेव्हा बीजिंग ऑलिम्पिकदरम्यान (Bejing Olympic) पाऊस पडू नये म्हणून आकाश मोकळं राहण्यासाठी चीनने क्लाउड सीडिंग तंत्राचा वापर केला होता. ऑलिम्पिक सुरू होण्याच्या आधी आकाशात एक हजाराहून अधिक रॉकेट्स एकाच वेळी डागण्यात आली. सगळा पाऊस आधीच पडावा आणि वातावरण मोकळं व्हावं, यासाठी हे करण्यात आलं होतं.
रॉकेटमध्ये सिल्व्हर आयोडाइड (Silver Iodide) आणि क्लोराइड (Chloride) भरून ते सोडलं जातं. त्यामुळे आजूबाजूला ढग (Clouds) तयार होतात आणि पाऊस पडतो. त्यानंतर काही काळासाठी आकाश निरभ्र राहतं. थोडक्यात म्हणजे आपल्याला हवा तेव्हा पाऊस पाडणं, असा या तंत्राचा उपयोग. अर्थात, यात महत्त्वाची गोष्ट अशी, की आकाशात ढग असतील तेव्हाच क्लाउड सीडिंग तंत्राने पाऊस पडू शकतो.
अमेरिकेसह अनेक देश पावसासाठी या तंत्राचा वापर करतात; मात्र याच्या वापरात चीन सगळ्यात आघाडीवर आहे. चीनने केवळ क्लाउड सीडिंगसाठी 35 हजार लोक तैनात केले आहेत.
भारत-चीन यांमधल्या तणावपूर्ण स्थितीत चीन कदाचित या तंत्राचा उलटसुलट पद्धतीने वापर करू शकतो. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका वृत्तात याचा उल्लेख आहे. मणिपाल अकादमीच्या असिस्टंट प्रोफेसर धनश्री जयराम यांच्या म्हणण्यानुसार, अनियंत्रित जिओरेग्युलेशन केलं, तर भारत-चीनमधला तणाव वाढू शकतो. त्याचा प्रभाव दीर्घ काळ राहू शकतो. चीन त्यांच्या भागात काही बदल घडवण्यासाठी प्रयत्न करत असेल, तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या देशातल्या वातावरणावरही होऊ शकतात.
एक प्रयोग म्हणून चीन त्यांच्याकडे अति पाऊस पडणाऱ्या प्रदेशाचं वातावरण बदलण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्याचा दुष्परिणाम भारतात आधीच ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो अशा ठिकाणी होऊन दुष्काळी स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे दोन्ही देशांत तणाव वाढू शकतो. नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी असाही धोका वर्तवला आहे, की चीन या प्रकल्पाद्वारे शेजारच्या राज्यांच्या पावसाची चक्क चोरी करेल आणि त्या देशांना दुष्काळी बनवू शकेल.
हे देखील वाचा - भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारताची कामगिरी गेल्या वर्षीपेक्षा निराशाजनक, हा देश ठरला सर्वोत्कृष्ट
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चीन सध्या वारंवार क्लाउड सीडिंग तंत्राचा वापर करत आहे. अशी वेळ लवकरच होऊ शकते, ती भारतातल्या नद्यांचं पाणी वापरून चीन ढग बनवू शकेल. त्यामुळे या पार्श्वभूमीवर, सीमावर्ती भागात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (GPS), रिमोट सेन्सिंग (Remote Sensing) तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, अशी गरज व्यक्त केली जात आहे, जेणेकरून चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवता येईल.
2020मधील पावसाच्या वेळी ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुराच्या वेळी चीनने भारताला पूर्वसूचना दिली नाही. त्यामुळे आसामचा मोठा भाग जलमय झाला. वॉटर डिप्लोमसी (Water Diplomacy) हे उल्लंघन आहे. चीन वारंवार अशा गोष्टी करतोच आहे. त्यामुळे भारत आपलं वेदर रडार नेटवर्क (Weather Radar Network) ईशान्येकडे अधिक वाढवत आहे. युरेशियन टाइम्सच्या वृत्तात ही बाब भू-विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. हिमालयात तीन रडार बसवण्यात आले असून, लवकरच बाकीचे रडारही बसविले जाणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं. ते कधीपर्यंत बसविले जाणार आहेत, याबद्दल नेमकी माहिती देण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, India china, Rain, Xi Jinping